एकविसाव्या
शतकातल्या ' राजगडा' वर म्हणजे ' कृष्णकुंजा' वर आम्ही पोचलो तेंव्हा
सकाळचे अकरा वाजत आले होते. दुपारच्या बारा वाजल्याखेरीज या ' राजगडा' ला
जाग येत नाही असे आम्हाला सांगण्यात आले होते. त्यामुळे आम्ही घरातून
उशिराच निघालो होतो. सकाळी लवकर जाऊन आपला 'पुतळा ' कशाला करावा असा विचार
करून आम्ही आमचे प्रस्थान लांबवले होते. आम्ही पोहोचलो तेंव्हा राजगड
आळोखेपिळोखे देत असेल असे आम्हाला वाटले होते. मात्र आमचा अंदाज चुकला (कसा
चुकला याचे वर्णन पुढे येईलच). हल्ली या गडावर कोणी फिरकत नाही असे
आम्हाला उद्धवराव वांद्रेकर या सद्गृहस्थाने दिवसा ढवळ्या (नाईट लाइफ़वेळी
नाही ) सांगितले होते. उद्धवरावांनी जे काही सांगितले ते शत प्रतिशत खरे
होते, 'राजगडा' बाहेर अक्षरश: सामसूम जाणवत होती. सामसूम असल्याने आम्हाला
'कृष्ण्कुन्जा' मध्ये कोणाची चिट्ठी नसताना ' राज' रोस प्रवेश मिळाला.
आम्ही दिवाणखान्यात जाउन बसलो. गडाच्या स्वामींचे श्वानप्रेम लक्षात घेता
आम्ही सांभाळूनच बसलो होतो. आम्हाला आमची ' औकात ' माहिती होती, त्यामुळे
आम्हाला चिकन सूप, वडे वगैरेंची अपेक्षा नव्हती. पण निदान चहा तरी विचारला
जाइल ही अपेक्षा पूर्ण होताना दिसत नव्हती. एवढ्या मोठ्या घरात एकही मनुष्य
प्राणी दिसत नव्हता. आता आपणच गडाच्या स्वामींना शोधावे असा विचार करून
आम्ही घरात कोण दिसते आहे का याचा शोध सुरु केला. संपूर्ण घर पालथे
घातल्यावर आम्हाला एका खोलीत काहीशी हालचाल जाणवली. खुर्ची सरकावल्याचा,
कागद फाड्ल्याचा आवाज कानावर येत होता म्हणून त्या खोलीकडे आम्ही कूच केले.
दरवाजावर टकटक करणार तेवढ्यात आम्हाला दरवाजा किंचित उघडाच असल्याचे
दिसले. आम्ही भीत भीत दरवाजा ढकलला. या खोलीत गडातील सहायक वगैरे कोणीतरी
असेल असे वाटले होते. पण पाहतो तर काय समोर आम्ही ज्यांना भेटण्यास आलो
होतो ते रा. श्री. ठाकरे …. हो तेच ते, खळ खटॅक ध्वनी लहरींचे निर्माते,
दिग्दर्शक आणि संकलक, 'टोल मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा या पथनाट्याचे
लेखक, संगीतकार (हे पथनाट्य पहिल्या अंकातील पहिल्या प्रवेशानंतर मागे
घेण्यात आले अशी नोंद एका बखरीत सापडते. पथनाट्याला एकही प्रेक्ष न आल्याने
ते मागे घेतले असे काही इतिहासकार म्हणतात तर काहींच्या मते पहिल्या
प्रवेशालाच एवढे मानधन आणि रॉयल्टी मिळाली की पुढे प्रयोग करण्याची गरजच
उरली नाही. असो.), कुणीच टाळी न दिल्याने ज्यांना टाळ वाजवत बसावे लागलं
आहे असे, ज्यांच्या कल्पनेतील गोदा पार्कची निर्मिती शतकानुशतके चालू आहे
असे महाराष्ट्राचे 'किंचित वॉल्ट डिस्ने ' (काही बखरकारांच्या च्या मते
आग्र्याचा ताजमहाल आणि गोदा पार्कच्या निर्मितीचे काम एकाच शक आणि
संवत्सरात चालू झाले होते. या विषयी संशोधकांत मतभेद आहेत. असो.) 'टोल
प्रतीपालक' रा. श्री. ठाकरे साक्षात उभे होते. आमच्या डोळ्यांवर
विश्वास बसेना म्हणून तीन चार वेळा चिमटे काढून पाहिले. प्रत्येक वेळी आपण
रा. श्री. ठाकरे यांच्या समोरच उभे आहोत हेच प्रत्येक चिमट्याने सांगितले.
स्वारी नेहमी संतापलेली असते असेही आम्ही ऐकून येतो. चुकून माकून काही
बोललो तर कानाखाली आवाज निघेल या शक्यतेने त्यांनी कीप डीस्टन्स वगैरे न
लिहिताही आम्ही सुरक्षित अंतरावर उभे होतो. संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग
दिसतो आहे का हे आम्ही पाहिले मात्र तशी व्यवस्था कुठेच दिसली नाही.असो.
त्या खोलीत आम्हाला जमिनीवर कागदाचे असंख्य कपटे पडलेले दिसले. हे कपटे का
पडलेले असावेत याचे कारण कळणे आमची अल्प वगैरे बुद्धी लक्षात घेता शक्यच
नव्हते. हे कपटे का पडले असे विचारायची सोय नव्हती. ' ज्यांनी पन्नास वर्षे
जनतेच्या अपेक्षांचे कागदापेक्षाही बारीक बारीक तुकडे केले त्यांना असे
का केले म्हणून तुम्ही विचारणार नाही, मला मात्र दोन वर्षात कागदाचे
कपटे का केले असे विचारता काय, ज्यांनी फक्त कागदी घोडे नाचवले त्यांना
जाउन विचारा की' अशा शब्दात स्वारी अंगावर खेकसली तर काय घ्या, म्हणून
आम्ही काहीच विचारले नाही. मौन पाळणे आम्ही पसंत केले. 'राजे 'आपल्याच
विचारात होते. आम्ही त्यांच्या कशात प्रवेश केला आहे आणि त्यांच्या समोर
उभे आहोत हे त्यांच्या अंमळ उशीराच लक्षात आले. एकदा आमच्याकडे आणि एकदा
खाली पडलेल्या कागदाच्या कचऱ्याकडे पहात ते म्हणाले, ' फारच कचरा झालाय .'
आम्ही नुसता हुंकार भरला.
' स्साला काय लिहावं हेच कळत नाहीये'
आमचा
पुनश्च हुंकार. काय लिहिताय असे विचारले तर ' खळ खटॅक ध्वनी लहरीं कानात
शिरून आयुष्यभर हिअरिंग मशीन लावावे लागण्याची भीती डोळ्यापुढे नाचत होती.
'
पहिला अग्रलेख लिहायला बसलोय. एक तास झालाय गाडी अजून दादर स्टेशनातच आहे.
लिहिण्यापेक्षा भाषण केंव्हाही बरे ' असे काहीसे पुटपुटत त्यांनी
आमच्याकडे पाहिले. पुटपुट करीत असतानाच राजे खुर्चीत जाउन बसले. मुद्रा
पुन्हा विचारमग्न. खाली पडलेला एक कागद आम्ही त्यांच्या नकळत उचलला आणि
त्यांच्या नकळत आम्ही तो वाचू लागलो. एक ऐतीहासिक दस्तऐवज हातात घेतला
आहे या जाणीवेने आम्ही रोमांचित होऊन गेलो.इतिहासात नोंद होणाऱ्या एका
संपादकाच्या पहिल्या अग्रलेखाचा कच्चा खर्डा आमच्या हातात होता. आम्ही तो
वाचावयास सुरुवात केली.
' माझ्या तमाम मराठी बंधू आणि भगिनींनो ।
आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्या अक्षरांनी नोंद होईल , हे
सध्या तरी आम्हाला सांगता येत नाही. आज आम्ही संपादक बनलो आहोत. संपादक
झाल्यावर अग्रलेख लिहिणे ओघाने आलेच. काही लोक आमचा पेपर वेळेत निघणार की
व्हिजन डॉक्युमेंट प्रमाणे त्याचाही पाळणा लांबणार असे म्हणत होते. अशा
लोकांच्या तोंडावर हा पेपर फेकताना आम्हाला झालेला आनंद शब्दात वर्णन करता
येईनासा झालाय. अशा बोलण्याची आम्ही सवय करून घेतलीय. काही जण आम्हाला बाईक
पार्टी म्हणताहेत. पुढे मी आणि मागे आमचा एकमेव आमदार. अनेकांना आम्ही
पेपर का काढतोय हे कळालेले नाही. कुणी म्हणतोय आम्हाला काही काम राहिलेले
नाही. एका आमदाराला सांगून सांगून काय सांगणार ? आम्हाला काम राहिलेले नाही
हे खरं आहे. किती वेळा नगरसेवकांच्या बैठका घ्यायच्या आणि त्यांना चांगली
कामे केली नाहीत तर माझ्याशी गाठ आहे असले इशारे द्यायचे ? '…. या पुढे
लेखणीने विश्राम घेतलेला दिसत होता.
' काय लिहावे हेच
कळत नाही. नॅशनल काही लिहावे म्हटलं तर त्या जमीन विधेयकातलं
आपल्याला काही कळत नाही. आमचा संबंध फक्त मुंबईतील गिरण्यांच्या मोकळ्या
जमिनीशी आलाय. तिथं आम्ही चुटकीसरशी जमिनी मिळवल्यात. शेतकरी जीन्स घालून
दिसला पाहिजे एवढ्यापुरताच आमचा शेतीशी संबंध आलाय. आपण शेतीवर बोलायला
जायचो आणि उद्या व्हॉटस ॲप, फेसबुक वर ' काळ्या मातीत मातीत, इंजिन चालते '
अशी पोस्ट पडायची. ' राजसाहेब मनाशीच बोलत होते. साहेबांचे
कन्फ्युजन (खरं तर फ्युजन) आमच्या लक्षात आले होते.
' बाय द वे तुम्ही इथं कशासाठी आला होता ?'
' आपण नवा पेपर काढताय, त्यात भविष्याचा कॉलम लागेलच ना. आम्हाला चान्स मिळेल का म्हणून विचारायला आलो होतो'
' आमचं भविष्य कळना झालंय आम्हाला आणि तुम्ही भविष्याचा कॉलम लिहू का विचारताय. ' राजे पुन्हा पुटपुटले.
' ते जाऊ द्या, तुम्हाला काय वाटतंय काय लिहावे पहिल्या अग्रलेखात ?' राजेंनी विचारले .
राजे मोकळेपणे बोलताहेत म्हणून आम्ही जरा बेसावध झालो आणि बोललो ' तुम्ही जादूविषयी लिहा.'
'
अहो माझी जनतेवर जादू आहेच, त्या शिवाय का लाखोची गर्दी जमते माझ्या
सभेला? त्या विषयी मी काय लिहायचे , सगळ्यांना माहिती आहेच आमच्या
जादूविषयी. ' राजे स्वत:वर चांगलेच खुश झाले होते.
' त्या जादुविषयी नाही हो. तुम्हाला आकड्यांची मोठी जादू येते म्हणे. '
' म्हणजे ? मला काही कळल नाही ? राजे उत्तरले.
' काही लोक लाखाचे बारा हजार करतात त्या प्रमाण तुम्ही तेराचे एक करता म्हणे ? '
पाच
दहा सेकंद शांततेत गेले. त्या नंतर ज्याला आम्ही घाबरत होतो त्या खळ खटॅक
ध्वनी लहरींचा कल्लोळ आमच्या कानात शिरला. कान अजून हुळहुळतोय.
चंद्रहास मिरासदार
झकास
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeleteछान
ReplyDelete