Saturday, 28 March 2015

फुल मुक्त एप्रिल

दरबार भरण्याची वेळ झालेली आहे. दरबारातले अच्चुत्य चिन्हांकित (काही जणांच्या मते हा शब्द अत्युच्च असावा पण चंद्रपूर च्या मूनगंटीवार नामक भाषा तज्ज्ञ सरदाराने हा शब्द अच्चुत्य असल्याचे एक नव्हे अनेक वेळा सांगितले होते. त्यांच्या मराठीच्या या ज्ञानामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या करीता जे प्रयत्न चालू आहेत त्या साठीचे नेतृत्व याच मूनगंटीवार नामक सरदाराकडे सोपवले जाणार असल्याचे कळते. मराठी भाषेचा दर्जा आणखी सुधारावा या साठी हे सरदार तिरुपती येथे बालाजीला  साकडे घालण्यासाठी जाणार असल्याचे कळते. त्या करीता या सरदारांना सरकारी हेलीकॉप्टर उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराजांनी नुकताच घेतलाय असे कानावर पडते. असो.) सरदार, मनसबदार दरबारात दाखल झालेले आहेत. गारपिटीने दिलेल्या तडाख्याने राज्यात दु:खाचे वातावरण आहे. मात्र रावसाहेब, भाउसाहेब आदी सरकारी मंडळींना आपले नवे सेवेचे नवे दुकान सुरु होणार म्हणून मनातून बरे वाटते आहे. गारपिटीचे पंचनामे, मदतीचे धनादेश अशी अंगमेहनतीची कामे करताना या मंडळींना एवढे श्रम होत की त्यांचे हात आपोआप 'ओले 'होत असत.  या मंडळींना पाउस भरपूर वगैरे पडला की आपली जनतेची सेवेची संधी हुकणार म्हणून अस्वस्थ व्हायला होत असे. पाउस भरपूर पडला की आपल्याला जनतेची टॅन्कर द्वारे पाणी, चारा छावणी वगैरेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळत नाही असे त्यांचे म्हणणे असायचे. सरदार, सुभेदार, मनसबदार वगैरे मंडळींमध्ये गारपीट वगैरे विषयाचीच चर्चा चालू आहे. तेवढ्यात महाराज आल्याची वर्दी दिली जाते. महाराज, प्रधानजी दरबारात दाखल होतात. महाराज आपल्या आसनावर स्थानापन्न होतात. दरबारावर एक नजर टाकून ते प्रधानजीन्कडे पाहून दरबार सुरु करण्याची खूण करतात. त्याच वेळी ते प्रधानजींना आपल्या मनगटावरच्या घड्याळाकडे खूण करून काही तरी डोळ्यांच्या इशाऱ्यानेच सांगतात. प्रधानजींनी वेळेतच आपले बोलणे संपवावे असा त्या इशाऱ्याचा अर्थ होता. प्रधानजीना तोंडासमोर एकदा माइक आला की किती वेळ सत्संग द्यायचा याचे भानच रहात नसे. दरबारातले बोलणे कमी पडते असे वाटून घेत ते आपली मन की बात या ना त्या मार्गाने जनतेला ऐकवण्याची  संधी सोडत नसत.त्यामुळे महाराजांनी प्रधानजींना प्री पेड कार्ड च दिले होते. पूर्वी प्रधान्जीकडे पोस्ट पेड कार्ड होते. मात्र त्याचे बिल फार येऊ लागल्याने दर दोन तीन दिवसांनी री चार्ज करावे लागेल असे कार्ड दिले होते. असो. हल्ली प्रधानजीच नव्हे तर प्रधानजिंचां गोतावळा फारच बोलू लागला होता. आपला माणूस प्रधान झालाय या आनंदात या लोकांची जीभ वारंवार घसरू लागली होती. जीभ घसरू लागल्यामुळे अनेक अपघात होऊ लागले होते. या मंडळींना ' शब्द्वापसी ' वगैरे प्रकार माहित नव्हते. या शब्दास्त्रांमुळे या परगण्याच्या अवकाशात, जमिनीवर सगळीकडेच युद्धसदृश वातावरण निर्माण झालेले होते. प्रधानजी बोलतात म्हणजे आपणही दिसामाजी काही तरी बोललेच पाहिजे असा समज करून घेऊन या मंडळींनी जो वाग्यज्ञ चालू केला होता त्यात महाराजांच्या राज्यातील शांततेची आहुती पडली होती. असो.
महाराजांची खूण ओळखून प्रधानजींनी बोलणे चालू केले. राज्याच्या काही भागातच यंदा दुष्काळ पडला आहे. खरे तर पावसामुळे दुष्काळाला आपला मुक्काम नाईलाजानेच हलवावा लागलाय. शहरात पाहुणा ज्या दिवशी येतो त्या दिवशीपासूनच अतिथी तुम कब जाओगे असे त्याला अप्रत्यक्षपणे सांगितले जाते. दुष्काळ मात्र त्याला अपवाद ठरतो आहे. त्याने येथे मुक्कामच ठोकावा अशी गळ चारा छावणीचालक, टॅन्कर चालक आदींनी त्याला घातली होती. भाउसाहेब, रावसाहेब आदी मंडळींनी त्या पुढे मजल मारत दुष्काळाच्या पालकांना पत्र पाठवीत त्याचा मुक्काम आणखी काही दिवस लांबवू देण्याची परवानगी मागितलेली होती. मात्र अनेक कामे खोळंबलेली आहेत असे सांगत त्याच्या पालकांनी ही विनंती अमान्य करून टाकलेली आहे. एवढे बोलून प्रधानजी पाणी पिण्याच्या निमित्ताने थांबतात. आणखी बोलले तर चालेल काय अशी परवानगी ते नजरेनेच महाराजांकडे मागतात. तेवढ्यात महाराजांचा चुणचुणीत, तरतरीत भ्रमणभाष ( स्मार्टफोन चे मायबोलीतील रुपांतर) थरथरतो ( व्हायब्रेट चे मायबोलीतील रुपांतर. मूळ इंग्रजी शब्द सांगितल्याखेरीज मराठी शब्दाचा अर्थच काही जणांना कळत नाही.अशांसाठी हे रुपांतर सप्रेम सादर .)  महराज तातडीने आपला भ्रमणभाष मधील संदेश पेटी पाहतात आणि  त्यातील संदेश वाचू लागतात. संदेश वाचताना महाराजांचा चेहरा गंभीर होऊन जातो. प्रधानजींनी  आपल्याकडे आणखी बोलण्याची परवानगी मागितलेली आहे हेही ते संदेश वाचताना विसरून जातात. पूर्ण संदेश वाचून झाल्यावर तर महाराज चांगलेच अस्वस्थ होतात. त्यांना दरदरून घाम फुटतो. त्यांचा चेहरा भयचकित होतो. त्यांची अवस्था पाहिल्यावर प्रधानजी,  सरदार घाबरून जातात. एकदम घाम आलाय हे पाहून काही जणांना वेगळीच शंका येते. तातडीने राजवैद्यांना दूरध्वनी केला जातो. मात्र पाच मिनिटातच महाराज पुन्हा सावरतात. काही घाबरण्याचे कारण नाही असे ते दरबारातील मान्यवरांना सांगतात आणि प्रधानजींना आपले अहवाल वाचन चालू ठेवण्यास सांगतात.
प्रधानजी बोलू लागतात, बाकी राज्यात नेहमीसारखे व्यवस्थित चालू आहे.  रस्त्यांचे आरोग्य बिघडलेले नसून ते पूर्वीसारखेच म्हणजे खड्डेयुक्त आहे. टोल ची साथ राज्यात झपाट्याने पसरत असून राज्यातल्या पायवाटाही टोलग्रस्त होण्याची शक्यता आहे. आता जनतेला टोल वाचून करमत नसल्याने शहरातल्या पदपथांवरही टोल आकारावा अशी मागणी जनतेकडून होऊ लागली आहे.आपणही या मागणीला होकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आपला अर्थसंकल्प नेहमीप्रमाणे तुटीचाच आहे. सामान्य माणसाला करातून सुटका मिळवण्यासाठी कोणतेच मार्ग शिल्लक ठेवले गेलेले नाहीत. राज्यातील खुनी मंडळींनी जादू टोणा वगैरे विद्या आत्मसात केलेल्या असल्याने त्यांना पकडणे अवघड होऊन बसले आहे. आरोपी कसे पकडावेत याचे शिक्षण तांत्रिक, मांत्रिक , बुवा महाराजांकडून मिळावे अशी विनंती पोलिस खात्याने केलेली असून ही मागणी मान्य करण्याचा गांभीर्याने विचार चालू आहे. त्या करीता देवऋषी, बंगाली बाबा वगैरे लोकांशी संपर्क साधण्यात आलेला आहे. डेंग्यू , चिकन गुनिया वगैरेंच्या साथीला आता स्वाईन फ्ल्यू नामक साथ आलेली असून त्याला हजार दोन हजार अशा किरकोळ संख्येने लोक बळी पडलेले आहेत . त्यामुळे ही साथ गंभीरपणे घ्यायची गरज नाहीये. 
एवढे बोलून प्रधानजी आपले चार शब्द संपवतात. प्रधान्जींच्या बोलण्यावरून तरी आपल्या राज्यात सर्व काही नेहमीसारखे चालू आहे, आपले राज्य कालच्याप्रमाणेच चालू आहे, राज्याच्या स्थितीत काडीचाही फरक पडलेला नाही हे महाराजांच्या लक्षात येते. त्यामुळे त्यांचा चेहरा दिव्य समाधानाने झळकू लागतो. मगाशी त्यांच्या भ्रमण भाष वर ' राज्यात स्थिती हाताबाहेर गेलेली आहे, रस्ते खड्डे मुक्त आणि धरणे पाणी युक्त झालेले आहेत, राज्यात सर्वत्र टोल मागे घेण्यात आलेला आहे, साध्वी , महाराज वगैरे प्रधान्जींच्या आप्तांनी तोंडातून ब्र न काढण्याची शपथ घेतलेली आहे ' असा संदेश आलेला असतो. हा संदेश पाहून महाराज अस्वस्थ झालेले असतात. मात्र त्याच वेळी महाराजांचे लक्ष समोर टांगलेल्या कॅलेंडर कडे गेलेले असते. कॅलेंडरवर एक एप्रिल ही तारीख पाहून महाराजांचा जीव भांड्यात पडतो. आपल्याला हा संदेश पाठवून कोणी तरी एप्रिल फुल केलेले आहे हे लक्षात आल्याने महाराज काळजीमुक्त होतात. आपले राज्य पूर्वीच्या वळणावरच चालू आहे या समाधानात ते दरबार संपल्याची खूण करतात.   
चंद्रहास मिरासदार

Saturday, 14 March 2015

पहिल्या अग्रलेखाच्या प्रसव वेदना

एकविसाव्या शतकातल्या ' राजगडा' वर म्हणजे ' कृष्णकुंजा' वर आम्ही पोचलो तेंव्हा सकाळचे अकरा वाजत आले होते. दुपारच्या बारा वाजल्याखेरीज या ' राजगडा' ला जाग येत नाही असे आम्हाला सांगण्यात आले होते. त्यामुळे आम्ही घरातून उशिराच निघालो होतो. सकाळी लवकर जाऊन आपला 'पुतळा ' कशाला करावा असा विचार करून आम्ही आमचे प्रस्थान लांबवले होते. आम्ही पोहोचलो तेंव्हा राजगड आळोखेपिळोखे देत असेल असे आम्हाला वाटले होते. मात्र आमचा अंदाज चुकला (कसा चुकला याचे वर्णन पुढे येईलच). हल्ली या गडावर कोणी फिरकत नाही असे आम्हाला उद्धवराव वांद्रेकर या सद्गृहस्थाने दिवसा ढवळ्या (नाईट लाइफ़वेळी नाही ) सांगितले होते. उद्धवरावांनी जे काही सांगितले ते शत प्रतिशत खरे होते, 'राजगडा' बाहेर अक्षरश: सामसूम जाणवत होती. सामसूम असल्याने आम्हाला 'कृष्ण्कुन्जा' मध्ये कोणाची चिट्ठी नसताना ' राज' रोस प्रवेश मिळाला. आम्ही दिवाणखान्यात जाउन बसलो. गडाच्या स्वामींचे श्वानप्रेम लक्षात घेता आम्ही सांभाळूनच बसलो होतो. आम्हाला आमची ' औकात ' माहिती होती, त्यामुळे आम्हाला चिकन सूप, वडे वगैरेंची अपेक्षा नव्हती. पण निदान चहा तरी विचारला जाइल ही अपेक्षा पूर्ण होताना दिसत नव्हती. एवढ्या मोठ्या घरात एकही मनुष्य प्राणी दिसत नव्हता. आता आपणच गडाच्या स्वामींना शोधावे असा विचार करून आम्ही घरात कोण दिसते आहे का याचा शोध सुरु केला. संपूर्ण घर पालथे घातल्यावर आम्हाला एका खोलीत काहीशी हालचाल जाणवली. खुर्ची सरकावल्याचा, कागद फाड्ल्याचा आवाज कानावर येत होता म्हणून त्या खोलीकडे आम्ही कूच केले. दरवाजावर टकटक करणार तेवढ्यात आम्हाला दरवाजा किंचित उघडाच असल्याचे दिसले. आम्ही भीत भीत दरवाजा ढकलला. या खोलीत गडातील सहायक वगैरे कोणीतरी असेल असे वाटले होते. पण पाहतो तर काय समोर आम्ही ज्यांना भेटण्यास आलो होतो ते रा. श्री. ठाकरे …. हो तेच ते, खळ खटॅक ध्वनी लहरींचे निर्माते, दिग्दर्शक आणि संकलक, 'टोल मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा या पथनाट्याचे लेखक, संगीतकार (हे पथनाट्य पहिल्या अंकातील पहिल्या प्रवेशानंतर मागे घेण्यात आले अशी नोंद एका बखरीत सापडते. पथनाट्याला एकही प्रेक्ष न आल्याने ते मागे घेतले असे काही इतिहासकार म्हणतात तर काहींच्या मते पहिल्या प्रवेशालाच एवढे मानधन आणि रॉयल्टी मिळाली की पुढे प्रयोग करण्याची गरजच उरली नाही. असो.), कुणीच टाळी न दिल्याने ज्यांना टाळ वाजवत बसावे लागलं आहे असे, ज्यांच्या कल्पनेतील गोदा पार्कची निर्मिती शतकानुशतके चालू आहे असे महाराष्ट्राचे 'किंचित वॉल्ट डिस्ने ' (काही बखरकारांच्या च्या मते आग्र्याचा ताजमहाल आणि गोदा पार्कच्या निर्मितीचे काम एकाच शक आणि संवत्सरात चालू झाले होते. या विषयी संशोधकांत मतभेद आहेत. असो.) 'टोल प्रतीपालक' रा. श्री. ठाकरे साक्षात उभे होते. आमच्या डोळ्यांवर विश्वास बसेना म्हणून तीन चार वेळा चिमटे काढून पाहिले. प्रत्येक वेळी आपण रा. श्री. ठाकरे यांच्या समोरच उभे आहोत हेच प्रत्येक चिमट्याने सांगितले. स्वारी नेहमी संतापलेली असते असेही आम्ही ऐकून येतो. चुकून माकून काही बोललो तर कानाखाली आवाज निघेल या शक्यतेने   त्यांनी कीप डीस्टन्स वगैरे न लिहिताही आम्ही सुरक्षित अंतरावर उभे होतो. संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग दिसतो आहे का हे आम्ही पाहिले मात्र तशी व्यवस्था कुठेच दिसली नाही.असो. त्या खोलीत आम्हाला जमिनीवर कागदाचे असंख्य कपटे पडलेले दिसले. हे कपटे का पडलेले असावेत याचे कारण कळणे आमची अल्प वगैरे बुद्धी लक्षात घेता शक्यच नव्हते. हे कपटे का पडले असे विचारायची सोय नव्हती. ' ज्यांनी पन्नास वर्षे जनतेच्या अपेक्षांचे कागदापेक्षाही बारीक बारीक तुकडे केले त्यांना असे का केले म्हणून तुम्ही विचारणार नाही, मला मात्र दोन वर्षात कागदाचे कपटे का केले असे विचारता काय, ज्यांनी फक्त कागदी घोडे नाचवले त्यांना जाउन विचारा की' अशा शब्दात स्वारी अंगावर खेकसली तर काय घ्या, म्हणून आम्ही काहीच विचारले नाही. मौन पाळणे आम्ही पसंत केले. 'राजे 'आपल्याच विचारात होते. आम्ही त्यांच्या कशात प्रवेश केला आहे आणि त्यांच्या समोर उभे आहोत हे त्यांच्या अंमळ उशीराच लक्षात आले. एकदा आमच्याकडे आणि एकदा खाली पडलेल्या कागदाच्या कचऱ्याकडे पहात ते म्हणाले, ' फारच कचरा झालाय .'
आम्ही नुसता हुंकार भरला.
' स्साला काय लिहावं हेच कळत नाहीये'
आमचा पुनश्च हुंकार. काय लिहिताय असे विचारले तर ' खळ खटॅक ध्वनी लहरीं कानात शिरून आयुष्यभर हिअरिंग मशीन लावावे लागण्याची भीती डोळ्यापुढे नाचत होती.
' पहिला अग्रलेख लिहायला बसलोय. एक तास झालाय गाडी अजून दादर स्टेशनातच आहे. लिहिण्यापेक्षा भाषण केंव्हाही बरे ' असे काहीसे पुटपुटत त्यांनी आमच्याकडे पाहिले. पुटपुट करीत असतानाच राजे खुर्चीत जाउन बसले. मुद्रा पुन्हा विचारमग्न. खाली पडलेला एक कागद आम्ही त्यांच्या नकळत उचलला आणि त्यांच्या नकळत आम्ही तो वाचू लागलो. एक ऐतीहासिक दस्तऐवज हातात घेतला आहे या जाणीवेने आम्ही रोमांचित होऊन गेलो.इतिहासात नोंद होणाऱ्या एका संपादकाच्या पहिल्या अग्रलेखाचा कच्चा खर्डा आमच्या हातात होता. आम्ही तो वाचावयास सुरुवात केली.
' माझ्या तमाम मराठी बंधू आणि भगिनींनो । आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्या अक्षरांनी नोंद होईल , हे सध्या तरी आम्हाला सांगता येत नाही. आज आम्ही संपादक बनलो आहोत. संपादक झाल्यावर अग्रलेख लिहिणे ओघाने आलेच. काही लोक आमचा पेपर वेळेत निघणार की व्हिजन डॉक्युमेंट प्रमाणे त्याचाही पाळणा लांबणार असे म्हणत होते. अशा लोकांच्या तोंडावर हा पेपर फेकताना आम्हाला झालेला आनंद शब्दात वर्णन करता येईनासा झालाय. अशा बोलण्याची आम्ही सवय करून घेतलीय. काही जण आम्हाला बाईक पार्टी म्हणताहेत. पुढे मी आणि मागे आमचा एकमेव आमदार. अनेकांना आम्ही पेपर का काढतोय हे कळालेले नाही. कुणी म्हणतोय आम्हाला काही काम राहिलेले नाही. एका आमदाराला सांगून सांगून काय सांगणार ? आम्हाला काम राहिलेले नाही हे खरं आहे. किती वेळा नगरसेवकांच्या बैठका घ्यायच्या आणि त्यांना चांगली कामे केली नाहीत तर माझ्याशी गाठ आहे असले इशारे द्यायचे ? '…. या पुढे लेखणीने विश्राम घेतलेला दिसत होता.
' काय लिहावे हेच कळत नाही. नॅशनल काही लिहावे म्हटलं तर त्या जमीन विधेयकातलं आपल्याला काही कळत नाही. आमचा संबंध फक्त मुंबईतील गिरण्यांच्या मोकळ्या जमिनीशी आलाय. तिथं आम्ही चुटकीसरशी जमिनी मिळवल्यात. शेतकरी जीन्स घालून दिसला पाहिजे एवढ्यापुरताच आमचा शेतीशी संबंध आलाय. आपण शेतीवर बोलायला जायचो आणि उद्या व्हॉटस ॲप, फेसबुक वर ' काळ्या मातीत मातीत, इंजिन चालते ' अशी पोस्ट पडायची. ' राजसाहेब मनाशीच बोलत होते. साहेबांचे कन्फ्युजन (खरं तर फ्युजन) आमच्या लक्षात आले होते.
' बाय द वे तुम्ही इथं कशासाठी आला होता ?'
' आपण नवा पेपर काढताय, त्यात भविष्याचा कॉलम लागेलच ना. आम्हाला चान्स मिळेल का   म्हणून विचारायला आलो होतो'
' आमचं भविष्य कळना झालंय आम्हाला आणि तुम्ही भविष्याचा कॉलम लिहू का विचारताय. ' राजे पुन्हा पुटपुटले.
' ते जाऊ द्या, तुम्हाला काय वाटतंय काय लिहावे पहिल्या अग्रलेखात ?' राजेंनी विचारले .
राजे मोकळेपणे बोलताहेत म्हणून आम्ही जरा बेसावध झालो आणि बोललो ' तुम्ही जादूविषयी लिहा.'
' अहो माझी जनतेवर जादू आहेच, त्या शिवाय का लाखोची गर्दी जमते माझ्या सभेला? त्या विषयी मी काय लिहायचे , सगळ्यांना माहिती आहेच आमच्या जादूविषयी. ' राजे स्वत:वर चांगलेच खुश झाले होते.
' त्या जादुविषयी नाही हो. तुम्हाला आकड्यांची मोठी जादू येते म्हणे. '     
' म्हणजे ? मला काही कळल नाही ? राजे उत्तरले.
' काही लोक लाखाचे बारा हजार करतात त्या प्रमाण  तुम्ही तेराचे एक करता म्हणे ? '
पाच दहा सेकंद शांततेत गेले. त्या नंतर ज्याला आम्ही घाबरत होतो त्या खळ खटॅक ध्वनी लहरींचा कल्लोळ आमच्या कानात शिरला. कान अजून हुळहुळतोय.  
चंद्रहास मिरासदार 

Monday, 9 March 2015

मराठी दिनाचा 'इव्हेंट'

हाय गाईज, टुडे वुई हॅव गॅदर्ड हिअर फॉर अ व्हेरी स्पेशल पर्पज. तुम्ही आज आमच्या रिक्वेस्ट चा ऑनर करून येथे आलात त्या बद्दल सर्वांना मेनी मेनी थॅन्क्स्. ऑल ऑफ अस नो, आज आपण येथे का प्रेझेंट राहिलो आहोत. आज आपण येथे मराठी दिन सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमची ऑर्गनायझेशन किती मराठी प्रेमी आहे याची सर्वांना कल्पना आहेच. आम्ही आमच्या ऑफिस मध्ये जे जे बोर्ड लावले आहेत त्या प्रत्येक बोर्ड खाली त्या त्या शब्दांचे मराठी भाषांतर लिहिलेले आढळून येईल. आमच्या ऑफिस च्या मेन डोअर जवळच लावलेल्या फलकाच्या खाली 'आपले स्वागत असो' अशी छोट्या अक्षरातील तळटीप लिहिलेली दिसून येईल. त्या बोर्ड वर मोठ्या अक्षरात वेलकम असे लिहिलेले दिसून येईल. कोणत्याही एक्स्चेंज ऑफर खाली * अटी लागू असे बारीक आणि न दिसणाऱ्या अक्षरात लिहिलेले असते तसेच आम्ही 'आपले स्वागत असो' असे लिहिलेले आहे. म्हणजे एखादा इंग्लिश न येणाऱ्या आणि फक्त मराठी  वाचता येणाऱ्या लोकांची आम्ही किती सोय केली आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. काही लोक दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात अशी डिमांड  करत असतात, त्या साठी व्हायोलन्स करत असतात. बट, आमच्याकडे अशी डिमांड करण्याच्या अगोदरच आम्ही त्यांची डिमांड फुलफील करून टाकली आहे. प्लीज राज साहेबांना आमच्या ऑर्गनायझेशन चे मराठी प्रेम आपण कन्व्हे करावे अशी माझी रिक्वेस्ट आहे. तर आज मी मराठी डे बाबत स्पीच देणार आहे. माझे स्पीच आपण केअरफुली लिसन करावे हि विनंती. तुम्ही आम्ही सर्वांनी एफ़र्टस घेतले तर मराठी नक्कीच एक्झिस्ट राहू शकेल.ऑल ऑफ अस अवेअर आज मराठीला हिंदी , इंग्लिश यांच्याशी खूपच टफ कॉम्पिटीशन द्यावी लागत आहे. आपले फ़ेस्टीव्हल्स आपण विसरत आहोत. आता हे  बघा आपण पूर्वी रंगपंचमी करायचो आता होली लाच सर्व जण रंग खेळतात. रंगपंचमीला कोणी कलर लावतच नाही. आपल्या शहरात भैय्ये वाढल्यामुळे सगळीकडे त्यांचेच फूड आपण खातो आहोत. चाट, तंदूर रोटी, पाणी पुरी…. इंग्लिश तर आपल्याला शिकणे कंपल्सरी झाले आहे. त्या शिवाय आपल्या मुलांना आयटी कंपन्यात नोकर्या मिळायच्या असतील तर त्यांना इंग्लिश आलेच पाहिजे. असे असले तरी आपण मराठी ला आपण विसरून चालणार नाही. आफ्टर ऑल इट इज अवर मदर टंग यार. फॉर धीस पर्पज वुई हॅव डीसायडेड टू स्पीक इन मराठी वन्स अ वीक. आमच्या सर्व मेम्बर्स ना हा रूल फॉलो करण्यास सांगितले. जो कोणी मेम्बर हा रूल फॉलो करणार नाही त्याला आम्ही शिक्षा म्हणून पाच मिनिटे सलग मराठी बोलायला सांगतो. आमचा हा रूल सगळेच मेम्बर्स फॉलो करतात. आंम्ही आमच्या ऑर्गनायझेशन चे मॅगॅझिन काढत असतो. त्यात एक तरी आर्टिकल, पोएम मराठी असली पाहिजे अशी आमची अट च आहे. या मासिकाचे जे एडिटर आहेत त्यांना आम्ही तश्या इंस्ट्रक्श्नस देऊन ठेवल्या आहेत.आय ॲम शुअर आमच्या मॅगॅझिन चे आपण सर्व मेम्बर व्हाल. काही काही ओल्ड जनरेशन चे लोक आमच्या अश्या बोलण्याला मिंग्लिश वगैरे म्हणतात. बट, वुई डोन्ट पे अटेन्शन टू दीज पीपल. हल्लीच्या यंग जनरेशन च्या तोंडातून इंग्लिश शब्द सहज बाहेर पडतात. त्याला आम्ही काय करणार. आता ओल्ड पीपल आपल्याला काही लागले तर आई ग असे म्हणतात. आम्ही यंग पीपल ओह शीट म्हणतो. यात काय चुकले ? आम्ही म्हणूनच अशाच भाषेत आमचे मॅगॅझिन काढत असतो. त्यामुळे आमचे मेम्बर वाढू लागले आहेत. आपली लँग्वेज अलाईव्ह ठेवण्यासाठी आपल्याला अशाच मिंग्लिश भाषेत बोलावे लागणार आहे ,लिहावे लागणार आहे. सो, लेट्स टेक अ प्लेज ऑन द ऑकेजन ऑफ मराठी डे, टू सेव्ह अवर मदर टंग. ऑल ऑफ अस विल स्पीक इन मराठी ॲट लिस्ट वन्स अ डे. देअर इज नो आल्टरनेटिव्ह बिफोर अस. आय थिंक माझे एवढे स्पीच इनफ आहे.मेनी मेनी थॅन्क्स् गाइज फॉर कमिंग हिअर.     
चंद्रहास मिरासदार 

Tuesday, 3 March 2015

माझ्या दमलेल्या ' पप्पू' ची कहाणी

सोनिया मॅम आपल्या निवासस्थानात बसलेल्या आहेत. हातात ' पालक नीती ' ची पुस्तके दिसताहेत. तेवढ्यात त्यांच्या हातातील फोन किणकिणतो. कन्या प्रियंकाचे नाव 'स्क्रीन' वर दिसल्यामुळे मॅम चा चेहरा उजळतो.
' मॉर्निंग, प्रियु बेटा , कशी आहेस '
' मी मस्त, तुझं काय चालू आहेय '
' माझं ठीक नाहीये. तुझ्या भावाचं काय होणार हाच विचार डोक्यात असतो. त्याला कसा हॅन्डल करायचं हेच कळत नाहीये.  त्यामुळेच थोडा त्रास होतोय ' सोनिया मॅम आपली व्यथा सांगतात.
'अगं शिकेल तो हळूहळू, अजून लहान आहे तो.'
' लहान कुठला ४५ वर्षांचा घोडा झालाय. बरं ते जाऊ दे, तुझ्या ओळखीचा प्रौढ बाळांसाठीचा एखादा समुपदेशक आहे का गं?       
' प्रौढ बाळ ? हे काय काढलं आहेस तू ?'
' अग ज्यांचं नुस्त वय वाढलंय अशा बाळांना प्रौढ बाळ म्हणतात असं ह्या पुस्तकात लिहिलंय. आपला राहुल अशांपैकीच आहे. अशा बाळांच्या पालकांकरीता ' पेरेंट्स ओरीएन्टेशन प्रोग्राम घेणारे समुपदेशक असतात असं ह्या पुस्तकात लिहिलेय. बघ जरा चौकशी करून '
आपला भाऊ हुशार असून त्याच्यासाठी समुपदेशक वगैरे लागणार नाहीत असे सांगण्याचा प्रयत्न प्रियंका करते. मात्र आईसाहेब ऐकायलाच तयार नव्हत्या. आईच्या समाधानासाठी हो, बघते असे म्हणत ती फोन ठेवून देते.  सोनिया मॅम पुन्हा पुस्तक वाचण्यात गढून जातात. त्यांची तंद्री भंगते ती दारावर झालेल्या टिकटिकी मुळे. सोनिया मॅम आपल्या तोंडासमोरचे पुस्तक बाजूला करून दरवाज्याच्या दिशेने पाहतात. दरवाजात चि. राहुल उभा असतो.
' काय आहे ? त्रासिक चेहऱ्याने मॅमची पृच्छा.
'रजेचा अर्ज द्यायला आलोय. ' चि. राहुल सांगतात.
'रजा ? तुला कशाला हवीय रजा ?'
' का म्हणजे ?वर्ष सव्वा वर्ष हिंडतोय मी. एका पाठोपाठ एक इलेक्शन झाल्यात. पायाला भिंगरी लावून हिंडलोय. आता मला सुट्टी नको का. किती दमायला झालंय मला. '
' अरे ते नमो अंकल बघ . तुझ्या पेक्षा २० वर्षांनी मोठे आहेत. ते सारखे हिंडत असतात. सारखी कुठे ना कुठे ना भाषणे चालू असतात. एक दिवसही सुट्टी घेतली नाहीये त्यांनी आणि तुला दमायला काय झालं रे हेलीकॉप्टर नं तर हिंडत होतास. सायकल चालवत अस्ता तर दमलाय असं म्हणता आलं असतं ' सोनिया मॅमचा आवाज चांगलाच चढलेला असतो. 
आईच्या हल्ल्याने चिरंजीव चांगलेच प्रथम गांगरतात आणि नंतर चिडतात. तरातरा आईच्या खोलीतून बाहेर पडतात.चिरंजीव चिडले आहेत हे लक्षात आल्यावर त्याच्या मागे मातोश्री धावतात.
' राहुल असं काय करतोस '
' ज्जा, मी नाही बोलणार तुझ्याशी. कट्टी, कट्टी, कट्टी ' स्वारी चांगलीच चिडलेली असते.
' रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू, तिकडून आला शिनचॅन, खुदकन हसू ' असं म्हणत त्या लेकाची समजूत काढायचा प्रयत्न करतात. शिनचॅन चं नाव ऐकल्यावर राहुलच्या चेहऱ्यावर काही काळ बारीक हसू येतं. त्याचा चेहरा पुन्हा फुगतो.
' अरे इथ पार्लमेंट च सेशन चालूय आणि तू रजा मागतो आहेस. '
' मला त्या बजेट मधलं ओ कि ठो कळत नाहीये. महसुली तुट. वित्तीय तुट, भांडवली खर्च, महसुली जमा… सगळ माझ्या डोक्यावरून जातंय. असली भाषणं ऐकून मला झोप येते. मग मिडीयावाले मी डुलक्या काढतो म्हणून बोंब ठोकतात. त्या पेक्षा मी सुट्टीच घेतो ना .'
' त्या लॅन्ड बिलावरून केवढा गोंधळ चालूय. आपल्याला चान्स आलाय त्या मोदींवर ॲटॅक करण्याचा आणि तू चाललास सुट्टीवर '
'त्या लॅन्ड बिलातल मला काहीसुद्धा माहित नाही. त्या पेक्षा तू रॉबर्ट जीजूंना सांग ना ह्यावर बोलायला. त्यांना जमीनी कमी किमतीत कशा ताब्यात घ्यायच्या हे माहिती आहे. '
आपल्या चिरंजीवांचे हे बोल ऐकून मातोश्री कपाळाला हात लावतात. असले उपाय हा सुचवू लागला तर आपले काही खरे नाही हे लक्षात येउन त्या चिरंजीवांची सीएल (चिंतन लीव्ह)  मंजूर टाकतात. - चंद्रहास मिरासदार

Monday, 2 March 2015

एक पत्र - मफलर चे सुटाला


माझे पत्र पाहून तुला नक्कीच आश्चर्य वाटत असेल. एक यकीश्चीत वुलनचा तुकडा माझ्यासारख्या महागड्या वस्त्र प्रावरणाला पत्र लिहिण्याचे धाडसच कसे करतो, असा रास्त प्रश्न तुझ्या चेहऱ्यावर पडलेला दिसतो आहे. मी तुला पत्र लिहिण म्हणजे एखाद्या इमिटेशन दागिन्यान हिर्याच्या नेकलेसला पत्र लिहिण्यासारखे आहे. आपल्या दोघातील तुलना इथेच थांबवतो. कारण मला अजून बरचं बोलायचं आहे. आपण दोघे एकाच कुळातले, भावकीतले.  वुलन, सूत ही एकाच घराण्याची लेकर आहेत हे तुला ठाऊक असेल. एवढ्या पुरताच तुझा आणि माझा संबंध. तू एक वस्त्र आणि मी वस्त्राबरोबर मिळणाऱ्या ॲक्सेसरीसारखा. हौस म्हणून तुला वापरल जात, तर मला गरज म्हणून वापरलं जात. लग्न समारंभात, लग्नाच्या स्वागत समारंभात, एखाद्या बड्या पाहुण्याच्या स्वागताकरिता तुला ट्रंकेतून चुकलो वॉर्डरोबमधून बाहेर काढलं जात. मी कपाटात कुठेतरी पडलेला असतो. किंवा माळ्यावर टाकलेल्या एखाद्या बॅगेत माझी आणि माझ्या थोरल्या भावाची, स्वेटरची आणि माझ्या बहिणीची कानटोपीची रवानगी केलेली असते. तस बघायला गेलं तर आम्ही तिघे अडगळीतच असतो म्हणा ना. आम्हाला माणूस मिरवण्यासाठी कधीच कपाटातून, बॅगेतून बाहेर काढत नाही. त्याची गरज भागवण्यासाठी आम्हाला बाहेर काढतो. त्याच्या लेखी आम्हाला काही किंमत नाही. स्वेटरला खरेदी करताना माणूस  नेपाळी विक्रेत्याशी किती घासाघीस करतात. नेपाळ्या कडून ५०० रुपयांचा स्वेटर १०० - २०० रुपयांत खरेदी केल्यास माणसाला आपण मोठी लढाई जिंकल्याचा आनंद होत असतो.  तसं तुझं नाही. तुझी जी किंमत लावली गेलेली असते तेवढी तुला खळखळ न करता दिली जाते. सामान्य माणसाला देखील आयुष्यात एकदा तरी सूट घालण्याची इच्छा असते. अनेकजण ही इच्छा सासऱ्याच्या पैशातून पूर्ण करतात. त्याकरता अनेक नवरोबा रुसून बसतात. हुंड्यात तू मिळणार हे सासऱ्याकडून कबुल करून घेतल्यावरच अनेक जण बोहल्यावर चढतात. असा मान मी, स्वेटर, कानटोपीला कधीच मिळालेला नाही. एखादा नवरा मुलगा सासऱ्याकडून मफलर हवा आहे म्हणून रुसून बसलाय असं कधी ऐकलं आहेस का ? नाही ना. आमची तेवढी योग्यता नाही. पण आम्ही तिघेही स्वयंपूर्ण आहोत, तू एवढा महागडा असूनही परावलंबीच आहे. सुटा खाली बूटच पाहिजे. सूट - बूट मे आया कन्हैय्या हे गाण तुला ठाऊक असेलच. सुटाखाली साधी चप्पल कोणीच घालत नाही. आमचं तसं नाही. कोणत्याही ड्रेस वर आम्ही फिट्ट बसतो. अमुक रंगाचा शर्ट नाही म्हणून मफलर घातला नाही अस म्हणणारा माणूस कुठेच दिसणार नाही. सूट फाटल्यावर तो रफू करून कोणी घालत नाही. मी फाटलो तरी माझ्यावर पडलेली भोके लपवून मला वापरले जाते.  तर अशा क्षुद्र मफलर ने आपल्याला का पत्र लिहावे असे तुला साहजिकच वाटणार. माझे तुझ्याकडे काही काम असेल अस वाटत असेल तर तो विचार काढून टाक. कुणाकडे शिफारस करण्यासाठी याने आपल्याला लांब लांबच देशस्थी नातं सांगत पत्र लिहिले का असे तुला वाटत असेल तर तुझा हा अंदाजही चुकीचा आहे. अशा कामासाठी तुला पत्र लिहिलेले नाही, लिहिणारही नाही. आपल्या दोघांच्या बाबत जे काही बोलले जात आहे ते माझ्या कानावर आले आहे. त्या बाबत तुझ्याशी बोलावे म्हणून पत्र प्रपंच. बरंच काही बोलायचे असल्याने तेवढा वेळ मोबाईलवर बोलणे मला परवडणार नाही. कारण माझी अवस्था तुला ठाऊक आहे. सध्या भारतात विशेषत: दिल्लीत मला बराच 'भाव' आल्याचे कळते आहे. जिकडे तिकडे माझेच नाव ऐकू येते आहे, तुला मात्र लोकांची बोलणी खावी लागत आहेत, तुझा उद्धार होतोय असंही माझ्या कानावर येतंय. अमिताभ हिरो असलेल्या चित्रपटात सुजित कुमार, ओमप्रकाश, डेव्हिड, असरानी, सुधीर या सारखे सहकलाकार भाव खाउन जावेत असं दिल्लीत झालेल्या ' इलेक्शन ' नामक चित्रपटात दिसले म्हणे. या चित्रपटात नायकाच्या अंगावरच्या १० लाखांच्या सुटाची नव्हे तर सहकलाकाराच्या मफलरचीच चर्चा झाली म्हणे. असे कसे झाले ? तुला माणूस अंगावर घालतो तेच मुळी ' भाव ' खाण्यासाठी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी. असे असताना तुझा भाव कमी झालाय याचं राहून राहून आश्चर्य वाटतंय. पण जे काही झालंय त्याला तू नाही तर तुला अंगावर मिरवणाराच जबाबदार आहे. तू स्वत:ला अपराधी (मराठीत गिल्टी) वाटून घेऊ नकोस. पूर्वी मुघले आझम मध्ये लावलेल्या काच महालाच्या सेट ची चर्चा झाली होती. देवदास मधल्या ऐश्वर्या, माधुरी च्या महागड्या पेहरावांची चर्चा झाली होती. अलीकडे नेते मंडळींच्या पेहरावाची चर्चा होऊ लागली आहे. काळ किती बदललाय. असो. आपल्यामुळे आपल्या मालकाला बरंच काही ऐकावे लागले असे वाटून घेऊ नका. असे होणारच होते. कुर्ता घालणारा, माझा कुर्ता मीच धुतो असे सांगणारा माणूस जेंव्हा दहा लाखांचा सूट घालतो तेंव्हा लोक 'सूट पे चर्चा ' करणारच. तुझा मालक ज्या राज्यातला आहे त्या राज्यातल्या मो. क. गांधी नामक इसमाने आयुष्यातली बरीच वर्षे अंगावर पंचा घालूनच काढली. 'साहेब ' भेटीला आला किंवा ' साहेबा' च्या भेटीला जायचे असल्यास तो माणूस पंचावरच जायचा. आताच्या काळात असा पेहराव करणे शक्य नाही. तुझ्या मालकाचा काही दिवसांपूर्वी साधा वेश हाच युएसपी होता. मालक जेंव्हा , 'हो मी चहा विकत होतो, गरीबीचे चटके मीही भोगले आहेत ' असे सांगत होता त्याच वेळी लोकांचा त्यावर विश्वास बसला. जर रवीनचंद्र अश्विन उद्या फिरकी सोडून मध्यमगती गोलंदाजी करू लागला किंवा धोनी सलामीला येउन गावस्कर, बॉयकॉट सारखा नांगर टाकू म्हणाला तर त्याचे जे होईल तेच तुझ्या मालकाचे झाले. तुझ्या मालकाच्या नावाने कुर्ते बाजारात आले आणि प्रचंड खपलेही. कारण साध्या कापडाचा कुर्ता हीच तुझ्या मालकाची ओळख होती. तो ही ओळख विसरला, म्हणूनच माझ्या मालकाने तुला मागे टाकले. कारण तू तुझ्या मालकाला ' सूट ' च होत नव्हतास.
असो. बाकी काय ? तुझ्या काही काळाच्या मालकाला (आता तुझा लिलाव झालाय म्हणे आणि तुला ४ कोटीला खरेदी केलंय म्हणे) रामराम सांग. माझा लिलाव होणार नाही , त्यामुळे माझा मालकही  बदलणार नाही.
तुझा
मफलर
प्रिय मफलरा,        
तुझे लांबलचक पत्र मिळाले. तू म्हणाला त्या प्रमाणे मी मालकाला ' सूट ' च होत नव्हतो. तुझ्या मालकाने स्वत:ला लकी म्हणवून घेतले होते. पण मी माझ्या मालकासाठी अनलकी ठरलो. शिवराज पाटील नामक गृहस्थ बॉम्ब स्फोट झाल्यावर कपडे बदलून, सूट घालून पाहणी करायला गेले होते. त्यांना पब्लिकची एवढी बोलणी खावी लागली होती विचारू नको. त्यांचा तो सूट बोहारणीने फुकट सुद्धा नेला नव्हता म्हणे.  आमचा मालक हे कसे काय विसरला कोणास ठाऊक ? शोले मध्ये रमेश सिप्पीने महागडे सेट लावले नव्हते. हीरोंचे (धर्मेंद्र, अमिताभ) कपडे साधे होते. खलनायक गब्बर तर मळक्या कपड्यातच दाखवलेला होता.कळकट अवतारातला, तंबाखू खाणारा गब्बर लोकांनी डोक्यावर घेतला. उलट शान मध्ये खलनायक शाकाल ला सुटा बुटात दाखवले. शान मध्ये प्रचंड खर्चाचे सेट लावले. काय उपयोग झाला ? काहीही नाही. शान दणकून आपटला. आता एवढं रामायण झाल्यावर आयुष्यात पुन्हा कधीच आमचा मालक असला महागडा सूट घालणार नाही.
असो. तुझ्या मालकाला शुभेच्छा.
तुझा
दहा लाखांचा सूट