Friday, 31 July 2015

उपमा आणि साहेब
भगवान शंकर नेहमीप्रमाणे पृथ्वीचा फेरफटका मारायला निघाले आहेत. पार्वती बरोबर आहेच. पृथ्वीचा फेरफटका मारताना हल्ली त्यांना विहिरीत कुऱ्हाड पडली म्हणून डोक्याला हात लावून बसलेला लाकूडतोड्या दिसत नव्हता. याचं कारण कुऱ्हाड बुडण्याएवढं पाणी असणाऱ्या विहीरीच राहिलेल्या नव्हत्या. समजा खरंच एखादा लाकुडतोड्या विहिरीत कुऱ्हाड पडली म्हणून बसलेला दिसला तर अडचण नको म्हणून शंकराने आपल्या बरोबर नॅनो जेसीबी मशीनहि घेऊन ठेवले होते. पृथ्वीचा हवाई फेरफटका मारताना अपेक्षेप्रमाणे त्यांना कुऱ्हाड विहिरीत पडलेला लाकुडतोड्या कुठेच दिसला नाही. मानवाला मदत करण्याचा योग आज आपल्या कुंडलीत नाही असे शंकराला वाटू लागले. तेवढ्यात त्यांचे लक्ष ऊसाच्या शेताशेजारी उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेले.
शंकराचे विमान हळूहळू खाली येते. ऊसाच्या शेताच्या बाजूला चिंताक्रांत चेहऱ्याने उभ्या असलेल्या माणसाच्या जवळ विमान उभे राहते. शंकर, पार्वती खाली उतरतात. साक्षात शंकराला पाहून त्या माणसाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.पण त्याला विश्वास ठेवणे भाग पडते. 
' बोल वत्सा, कसली काळजी पडली आहे तुला ' भगवान शंकर आत्यंतिक प्रेमळ स्वरात विचारतात. 
' देवा अगदी वेळेवर आलास बघ. लाकूडतोड्याला कुऱ्हाड काढून दिल्याची गोष्ट लहानपणापासून ऐकत आलोय मी. मलाही तशीच मदत कर देवा ' चिंताक्रांत चेहऱ्याचा माणूस कळवळीने शंकराला सांगतो. 
' अगदी मोकळेपणे सांग. तुझ्यासारख्या माणसांसाठी तर आम्ही चोवीस तास हेल्पलाईन चालू केली आहे. कुठे पडली आहे तुझी कुऱ्हाड  '  भगवान शंकर अजून लाकूडतोद्याच्या गोष्टीतून बाहेर आलेले नसतात. 
' माझी कुऱ्हाड पडली नाहीये' 
' मग काही हरवलंय का ' 
' काही नाही हरवलंय.'
' मग काय प्रॉब्लेम आहे तुझा ?' 
' माझी जीभ सारखी घसरतीय हो अलीकडे ' त्या माणसाने आप प्रॉब्लेम एकदाचा सांगितला. 
' पाउल घसरत हे ऐकून माहित होतं. पण जीभहि घसरते हे पहिल्यादांच ऐकतोय. हा काय प्रकार आहे वत्सा ' 
' पाऊल घसरण्यासारखा प्रकार नाहीये हो हा ' शंकराला कसे समजावून सांगावे असा प्रश्न त्या माणसापुढे पडतो. मग काही विचार करून तो बोलू लागतो. 
' या प्रकाराला स्लीप ऑफ टंग असे म्हणतात. यात काय होत, त्या माणसाचा आपल्या तोंडावर ताबाच रहात नाही. '
भगवान शंकर त्या माणसाला आपादमस्तक न्याहाळतात. सवयीप्रमाणे पार्वती नवऱ्याच्या मनात काय चालले आहे हे ओळखते. 
' अहो त्यांचा ' खाण्या ' वर ताबा नाही असं त्यांना म्हणायचं नाही. त्यांचा त्यांच्या बोलण्यावर ताबा राहिलेला नाही असं त्यांना सांगायचेय ' पार्वती आपल्या पतिराजांना सांगते. हे ऐकून तो माणूस बरोबर आहे अशा अर्थाने आपली मान हलवतो. 
  शंकराला या स्लीप ऑफ टंग झालेल्या इसमाबद्दल कुतूहल वाटू लागते. ते त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहू लागतात. काही क्षणातच त्या इसमाची कुंडली शंकराच्या मन:चक्षू समोर उभी राहते. सदरहू इसमाचा अलीकडे आपल्या बोलण्यावर ताबा राहिलेला नाही हे शंकराच्या लक्षात येते. सदर व्यक्ती अलीकडे वारंवार मध्यावधी निवडणुकीचे भजन म्हणू लागली आहे असेही भगवान शंकराला दिसते. साहेब म्हणून परिचित असणाऱ्या या व्यक्तीने आपल्या मुंब्रा स्थित जितेंद्र नामक एका सहकाऱ्याला सुविद्य, सुशीक्षीत अशा उपमा दिल्याने भूतलावर हास्य स्फोट होऊ लागले आहेत. लोक हसून हसून गडाबडा लोळू लागले आहेत.  या हास्यस्फोटाचे जनतेवर भयंकर परिणाम झालेले आहेत. आपली काम धामे सोडून लोक हसतच बसले आहेत. एकूणच भूतलावर साहेबांच्या उपमा नामक गृह उद्योगाने अनर्थ माजला आहे. आपण असे काही आहोत हे जितेंद्र नामक व्यक्तीलाही ठाऊक नव्हते. त्यामुळे त्या व्यक्तीलाही आपल्याबाबत साहेब नामक व्यक्तीने दिलेल्या उपमेमुळे जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. आपल्यात एवढे दुर्गुण आहेत आणि साहेब नामक व्यक्तीने आपल्याला हे आधीच न सांगितल्याबद्दल चि. जितेंद्र याला साहेब नामक इसमाचा भयंकर राग आला आहे. आता साहेब या व्यक्तीला आपण काय बोलून गेलो हे कळले आहे. उपमा देण्याची ही सवय अशीच राहिली तर आपण छगन नामक इसमाला 'दारिद्र्य रेषेखालील माणूस ' अशी उपाधी देऊ अशी भीती साहेबांना वाटू लागली आहे … साहेब नामक इसमाची कुंडली मन:चक्षुपुढे दिसल्यावर शंकराला त्या माणसाच्या प्रॉब्लेम वर काय औषध द्यावे हे लक्षात येत नाही.  
' वत्सा, तू विहिरीत काय समुद्रात सापडलेली कुऱ्हाड काढून देईन. मात्र ही तुझी घसरलेली जीभ शोधणे महाअवघड आहे. ' असं म्हणत भगवान शंकर पार्वतीसह आपल्या विमानातून निघून जातात.
चंद्रहास मिरासदार

Friday, 17 July 2015

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम

भ्रष्टाचाराला आज आपला खूप खूप अभिमान वाटू लागला होता. याला कारण तसेच घडले होते. स्वच्छ कारभाराचे ब्रँड ऍंबॅसिडर ठाकरे कुलवंशीय श्रीमान उध्दवराव यांनाही भ्रष्टाचाराचे दर्शन घडले होते. 'बघावं तिकडे भ्रष्टाचार दिसतो आहे' असे उध्दवराव म्हणाल्याचे भ्रष्टाचाराने आपल्या सुपाएवढया कानांनी ऐकले होते. उध्दवराव हा एक सरळ, भला माणूस म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द होता. त्याचे पाऊल कधीच वाकडे पडायचे नाही. त्याचे पाऊल वाकडे पडू नये यासाठी पांढऱ्या शुभ्र पैशाचे उत्पादक असलेले अविनाशजी भोसले यांनी 'पांडव' नामक आपले हेलीकॉप्टर उध्दवरावांच्या सेवेस हजर ठेवले होते. याच वाहनातून उध्दवरावांना गड-किल्ल्यांची छायाचित्रे काढता येत असत. असो. अशा उध्दवरावांनी आपले 'नाव घेतले' याचा भ्रष्टाचाराला कोण म्हणून आनंद झालेला होता. याच आनंदात तो उध्दवरावांना भेटण्यास निघालेला होता. मातोश्री नामक उध्दवरावांच्या सदनिकेत तो सक्काळी सक्काळीच दाखल झाला. पाहतो तर तेथे तोबा गर्दी उसळलेली. आपल्याला या गर्दीतून उध्दवरावांना भेटावयास मिळणार का? असे त्याला वाटू लागले. दालनाबाहेर 'जय-विजय' अशा दोघांच्या भूमिका एकटेच सांभाळणारे मिलिंदराव नार्वेकर मुंगीलासुध्दा शिरू देत नव्हते. बडया राजकीय मंडळींकडे किंवा अधिकाऱ्यांकडे जायचे असेल, तर अविनाश भोसले या 'मास्टर की'चे नाव घ्यायचा अवकाश, तुमच्यासाठी सर्व गड-कोटांचे दरवाजे किलकिले नव्हे, तर सताड उघडे होतात, असे भ्रष्टाचाराला एका पत्रकाराने खात्रीपूवक सांगितले होते. अविनाश भोसले ही मास्टर-की असेल, तर संजयनाना काकडे नामक 'बनवून आणलेली किल्ली'सुध्दा या लोकांकडे जाताना उपयोगी ठरते, असेही त्याला पत्रकार मित्राने सांगितले होते. पत्रकार मित्राने रात्रीच्या मैफलीत रात्री अकरानंतर सांगितलेले किती खरे आहे, याची चाचणी घेण्याचे भ्रष्टाचाराने ठरविले. पहिला प्रयोग चि. उध्दवरावांकडे करण्याचे ठरविले. कारण एक वेळ राष्ट्रपती, पंतप्रधानांनासुध्दा भेटणे शक्य आहे; पण चि. उध्दवरावांभोवती नार्वेकर नामक 'चायना...' चुकलो, 'मालवणी वॉल' असल्याने त्यांच्यापर्यंत भल्याभल्यांना पोहोचता येत नाही, असे भ्रष्टाचाराने ऐकले होते, वाचले होते. आताही तशीच परिस्थिती आहे का, याची 'टेस्ट' चि. उध्दवरावांकडे घेण्याचे योजिले होते. पत्रकार मित्राने रात्रीच्या मैफलीत रात्री अकरानंतर सांगितलेली गोष्ट म्हणजे 'ब्रह्मवाक्य' आहे, याचे प्रत्यंतर भ्रष्टाचाराला अर्ध्या मिनिटात आले. 'अविनाश भोसले' हे दोन शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडताच 'खुल जा सिमसिम'प्रमाणे उध्दवरावांच्या दालनाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले गेले. आत नेते, उपनेते, विभागप्रमुख, शाखाप्रमुख अशा मंडळींच्या गर्दीत चि. उध्दवराव बसलेले... चि. उध्दवराव आपल्या सैनिकांना पावसाळयात नाले सफाई, रस्ते दुरुस्तीची टेंडर कशी मंजूर करायची याचे धडे देत होते. लो, हायेस्ट अशी निविदांची बोली ऐकू येत होती. थोडया वेळाने सुटाबुटातील काही खाशी मंडळी दालनात दाखल झाली. 'कुणाची किती टक्क्यांची ऑॅफर आहे?' अशी भाषा भ्रष्टाचाराच्या कानी पडू लागली. काहीतरी सांकेतिक भाषेत बोलले जाऊ  लागले. हे काय चालले आहे हे भ्रष्टाचाराला कळेना. थोडया वेळाने 'झालं का डील फायनल?' असे काहीतरी उध्दवरावांनी समोरच्या मंडळींना विचारले. उपस्थितांनी माना डोलावल्या. शिववडा, चहाचा आस्वाद घेऊन मंडळी पांगली. उध्दवरावांचे लक्ष कोपऱ्यात बसलेल्या भ्रष्टाचाराकडे गेले. ही व्यक्ती आपल्याशी संबंधित नाही, हे त्यांच्या लगेच लक्षात आले. आता औपचारिक ओळख वगैरे करून देण्या-घेण्याचा उपचार पूर्ण करण्याऐवजी भ्रष्टाचार स्वत:च उठला. त्याने उध्दवरावांना आपली ओळख करून दिली. तुम्ही रागावल्याने आपण येथवर आलो वगैरे गोष्टी त्याने सविस्तर सांगितल्या.
''मी तुमच्यावर रागावलो असं कोण म्हणालं?'' उध्दवरावांनी विचारले.
''अहो, तुम्हीच तर म्हणालात ना, जिकडे पाहावं तिकडे भ्रष्टाचारच दिसतोय म्हणून..''
''हो, म्हणालो ना. त्यात काय चुकलं?'' उध्दवरावांची पृच्छा.
''म्हणजे हे बघा, तुम्ही सगळयांना दर्शन देता, मला मात्र देत नाही असं मला म्हणायचं होतं.'' एवढे बोलत उध्दवराव खुर्चीतून उठले. भ्रष्टाचाराचा चेहरा अजूनही बावचळलेलाच दिसत होता. उध्दवरावांनी काय दृष्टान्त दिला आहे, हे भ्रष्टाचाराच्या डोक्यात शिरेपर्यंत उध्दवराव मातोश्रीबाहेर पडले होते.

Sunday, 5 July 2015

चला ' हवा' येऊ द्या

सकाळची साडे नऊ - दहाची वेळ…. वाहनांच्या गर्दीने तुडुंब भरलेला रस्ता …  दुचाकी धारकांच्या झुंडीच्या झुंडी त्या चौकात येउन आदळत होत्या ….त्यात भर पडत होती ती सहा आसनी रिक्षा , बस, चारचाकींची. या गर्दीचा एक भाग बनलेल्या दीपक सरदेशमुख ला ही गर्दी असह्य व्हायची. मात्र दररोजच त्याला या गर्दीचा नाइलाजाने भाग बनावे लागायचे. पन्नाशी नुकतीच ओलांडलेल्या दीपक ला या वाहनांच्या गर्दीचा महासागर दररोज पार करून जावे लागे. श्वास घुसमटून टाकणारी ही गर्दी त्याच्या आयुष्याचा भाग बनून गेली होती. सकाळी आणि संध्याकाळी ऑफिसला जाताना आणि येताना या गर्दीतून मार्ग काढताना त्याला ब्रह्मांड आठवे. संध्याकाळी घरी परतल्यावर चहा घेत असताना आपल्या यांत्रिक जीवनाची त्याला मनस्वी चीड येत असे. मोकळा श्वास सुद्धा घेण्याची परवानगी न ठेवलेल्या या गर्दी आणि कोलाहलाने आपल्या अंगातला चैतन्य, उत्साह यांचा रस शोषून घेतला आहे असे त्याला नेहमी वाटायचे. या आयुष्याच्या नावाने सुस्कारे टाकीत चहा संपवणे आणि फिरायला निघणे हाही त्याच्या आयुष्य्क्रमाचा भाग बनला होता. आपली ही अवस्था पाहून त्याला 'आंधी' मधल्या संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांच्यातल्या एका प्रसंगातील संवादाची हटकून आठवण व्हायची. वडिलांच्या आग्रहापोटी राजकारणात पडावे लागलेल्या सुचित्रा सेन ला आपल्या पतीपासून वेगळे राहण्याशिवाय पर्यायच उरत नाही. पतीने म्हणजे संजीवकुमारने तिच्यापुढे राजकारण किंवा संसार असा पर्याय ठेवलेला असतो. ती राजकारणात गेल्यावर दोघे मनाने विभक्त होतात.राजकारणाच्या धबडग्यात सुचित्रा सेन व्यग्र होऊन जाते. एका निवडणुकीच्या प्रचारासाठी ती संजीवकुमार रहात असलेल्या गावात येते आणि तो व्यवस्थापक असलेल्या हॉटेल मध्येच उतरते. तिला आपला पती त्या हॉटेल चा व्यवस्थापक आहे हे ठाऊकच नसते. कळाल्यावर ती स्वत:हून त्याच्या घरी जाते. नऊ वर्षांनी ते दोघे एकमेकांना भेटत असतात. जेवण वगैरे झाल्या नंतर दोघे गावाजवळच्या एका बागेत जातात. बागेतील फुले, कारंजी या विषयी संजीवकुमार भरभरून सांगत असतो. रात्रीची वेळ असल्याने वातावरणात विलक्षण शांतता असते.बागेतील फुले,  कारंजी या विषयी सांगणाऱ्या संजीव कुमारला अडवून सुचित्रा सेन म्हणते ,' कहा आ पाउंगी मैं,'  तू हे सगळं सांगतो आहेस खरे पण मला  राजकारणातल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून मला बागेत बिगेत जायला कधीच जमणार नाही असा तिच्या बोलण्याचा सूर असतो. तेंव्हा तिच्याकडे पहात किंचितस हसत आकाशातल्या चंद्राकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, ' ये जो चांद हैं ना इसे रात में देखना ये दिन में निकलता नही ' 
राजकारणातल्या धबडग्यातून जरासाही मोकळा वेळ काढू न शकणाऱ्या आंधीतल्या सुचित्रा सेन आणि वाहनांच्या गर्दीतून रस्ता काढीत, कर्णकर्कश हॉर्नचा कानावर होणारा बलात्कार सहन करत दिवस ढकलणारे आपण यात  दीपकला खूपच साम्य वाटत असे. ऑफिसला जाताना येतानाच नव्हे तर किरकोळ, किरकोळ कामासाठी गावात जावे लागणाऱ्या दीपकला प्रचंड दमायला व्हायचे. त्याच्या घराबाहेरच्या रस्त्यावर पॅगो सहा आसनी रिक्षांचे आणि नियम धुडकावत जाणाऱ्या  नाना प्रकारच्या बाइकचे आवाज त्याला सहन करता यायचे नाहीत. या गर्दीतून आपली दुचाकी दामटत असताना त्याला तीस चाळीस वर्षापूर्वीच्या पुण्याची आठवण होऊ लागायची. आपला मुळचा शांत स्वभाव बाजूला टाकत वाहनांच्या वेगाने धावणारे पुणे पाहून तो नेहमी भयचकित व्हायचा. आजच्या पिढीतल्या मुलांना जुने पुणे इतके सुंदर होते हे ठाऊक होणार नाही या जाणीवेने त्याला अस्वस्थ व्हायला व्हायचे. पुण्याच्या गर्दीचा वेग गाठताना आपल्यासारख्याला धाप लागते मात्र तरुण पिढीला या गर्दीचे , गजबजाटाचे काहीच कसे वाटत नाही याचे त्याला आश्चर्य वाटायचे. ३०- ४० वर्षांपूर्वी पुणे हे खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय होते. तेंव्हा पुण्यातच नव्हे तर सांगली, सोलापूर, सातारा, नगर , कोल्हापूर या आसपासच्या भागातही नवश्रीमंत नावाची जमात जन्माला आली नव्हती. शिक्षक, सरकारी कारकून, बँक, एलआयसी , कम्प्न्यान्त्ले कारकून , आजूबाजूच्या बजाज, किर्लोस्कर या कम्प्न्यान्त्ले कारकून हा वर्ग खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय होता. किराणा खरेदी करताना रुपया दोन रुपया वाचविण्याची या वर्गाची धडपड असायची. त्यावेळी बजाज स्कूटर साठी आणि टेलीफोनसाठी नंबर लावणे आणि जमलच तर एखादा फ्लॅट बुक करणे एवढीच मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांची लक्ष्मणरेषा होती. शिक्षक एवढेच नव्हे तर प्राध्यापकाचेही सायकल हेच वाहन होते. संध्याकाळी कामावरून घरी आले की पाय मोकळे करायला लकडी पूल, शनिवार वाडा, पर्वतीपर्यंत जाणे, अधूनमधून नीलायम, प्रभात, विजय हिंदी मराठी सिनेमे पाहणे , फारच चैन म्हणायची झाले तर टीळक रोडवर नेहरू स्टेडियम बाहेर असलेल्या अप्सरा ला कटलेट खायला जाणे … मध्यमवर्गीयांचे जीवन एवढे सुटसुटीत , मर्यादित आणि म्हणूनच छान होते. सर्दी, खोकला  असल्या किरकोळ आजारांवर औषध द्यायला फॅमिली डॉक्टर असायचे, त्यावेळी सर्दी खोकला झाल्यावर सतराशे साठ टेस्ट करून घेण्यास सांगणारे डॉक्टर अजून उदयाला आले नव्हते. हृद्य  विकार, रक्त दाब, मधुमेह, स्पोन्डिलायटीस अशा श्रीमंत आजारांनी त्यावेळी घरोघरी प्रवेश केलेला नव्हता. त्यावेळी फुले मंडईत भाजीला जाताना होंडा , सुझुकी अशा दुचाक्या घेऊन जाण्याची प्रथा रूढ झालेली नव्हती. भरपूर चालणे, सायकलिंग यांनी लहान थोरांच्या तब्येती ठणठणीत होत्या.फॅमिली डॉक्टरचे बिल ही किराणा दुकानदाराप्रमाणे महिन्याच्या महिन्याला चुकते व्हायचे. बहुतांश मध्यमवर्गीयांची घरे भाड्याचीच असायची. वास्तुशास्त्र, फेंगशुई सारख्या वास्तूंच्या शास्त्रांनी झपाटल नव्हतं. दुचाकी सुद्धा फार कमी लोकांकडे असायची. त्यामुळे रात्रीची झोपमोड व्हायला कारचा रिव्हर्स हॉर्न वगैरे भानगड नव्हती. एप्रिल मे मध्ये वसंत व्याख्यानमाला , मॅजेस्टीक गप्पा यांना तुडुंब गर्दी व्हायची. एकूण काय तर गरजा मर्यादित मात्र अमर्यादित अशी स्थिती असायची. त्या निवांत आयुष्यात , ' वेळच मिळत नाही ' अशी तक्रार करायला कोणालाच जागा नव्हती. निवान्तप्णाचा आणि आनंदाचा सुखाचा प्याला सुखाने एन्जॉय करता येत होता. 
आता हे सगळं इतिहासजमा शालेय याची जाणीव दीपक सरदेशमुख ला वारंवार छळायची. चिमणबागेतल्या चाळीत राहणाऱ्या दिपकने आपल्या आयुष्याची जवळपास तीस वर्षे तेथे घालवली होती. आता गावात राहणाऱ्या लोकांना पाय मोकळे करायला बाहेर पडावे म्हटले तर जीव मुठीत घेऊन चालावे लागते. एखाद्या सुट्टीला पर्यटन स्थळी जावे म्हटलं तर तीही माणसांच्या आणि वाहनांच्या गर्दीने गजबजलेली असतात. महाबळेश्वर, दिवेआगर, गणपती पुळे, पन्हाळा. हरी हरेश्वर … कुठेही जा सगळीकडे पुणेकरांची गर्दी असतेच. त्यात मोबाइल नामक कर्ण पिशाचाची भर पडलीय. शरीराने पुण्याबाहेर गेलात तरी मोबाइल तुम्हाला त्याच धकाधकीत आणून सोडतो. असो. आता हे असंच राहणार असे म्हणत दिपकने सुस्कारा टाकला. आजवर त्याने असे किती सुस्कारे टाकले असतील कोणाला ठाऊक ?
चंद्रहास मिरासदार