भ्रष्टाचाराला आज आपला खूप खूप अभिमान
वाटू लागला होता. याला कारण तसेच घडले होते. स्वच्छ कारभाराचे ब्रँड
ऍंबॅसिडर ठाकरे कुलवंशीय श्रीमान उध्दवराव यांनाही भ्रष्टाचाराचे दर्शन
घडले होते. 'बघावं तिकडे भ्रष्टाचार दिसतो आहे' असे उध्दवराव म्हणाल्याचे
भ्रष्टाचाराने आपल्या सुपाएवढया कानांनी ऐकले होते. उध्दवराव हा एक सरळ,
भला माणूस म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द होता. त्याचे पाऊल कधीच वाकडे पडायचे
नाही. त्याचे पाऊल वाकडे पडू नये यासाठी पांढऱ्या शुभ्र पैशाचे उत्पादक
असलेले अविनाशजी भोसले यांनी 'पांडव' नामक आपले हेलीकॉप्टर उध्दवरावांच्या
सेवेस हजर ठेवले होते. याच वाहनातून उध्दवरावांना गड-किल्ल्यांची
छायाचित्रे काढता येत असत. असो. अशा उध्दवरावांनी आपले 'नाव घेतले' याचा
भ्रष्टाचाराला कोण म्हणून आनंद झालेला होता. याच आनंदात तो उध्दवरावांना
भेटण्यास निघालेला होता. मातोश्री नामक उध्दवरावांच्या सदनिकेत तो सक्काळी
सक्काळीच दाखल झाला. पाहतो तर तेथे तोबा गर्दी उसळलेली. आपल्याला या
गर्दीतून उध्दवरावांना भेटावयास मिळणार का? असे त्याला वाटू लागले.
दालनाबाहेर 'जय-विजय' अशा दोघांच्या भूमिका एकटेच सांभाळणारे मिलिंदराव
नार्वेकर मुंगीलासुध्दा शिरू देत नव्हते. बडया राजकीय मंडळींकडे किंवा
अधिकाऱ्यांकडे जायचे असेल, तर अविनाश भोसले या 'मास्टर की'चे नाव घ्यायचा
अवकाश, तुमच्यासाठी सर्व गड-कोटांचे दरवाजे किलकिले नव्हे, तर सताड उघडे
होतात, असे भ्रष्टाचाराला एका पत्रकाराने खात्रीपूवक सांगितले होते. अविनाश
भोसले ही मास्टर-की असेल, तर संजयनाना काकडे नामक 'बनवून आणलेली
किल्ली'सुध्दा या लोकांकडे जाताना उपयोगी ठरते, असेही त्याला पत्रकार
मित्राने सांगितले होते. पत्रकार मित्राने रात्रीच्या मैफलीत रात्री
अकरानंतर सांगितलेले किती खरे आहे, याची चाचणी घेण्याचे भ्रष्टाचाराने
ठरविले. पहिला प्रयोग चि. उध्दवरावांकडे करण्याचे ठरविले. कारण एक वेळ
राष्ट्रपती, पंतप्रधानांनासुध्दा भेटणे शक्य आहे; पण चि. उध्दवरावांभोवती
नार्वेकर नामक 'चायना...' चुकलो, 'मालवणी वॉल' असल्याने त्यांच्यापर्यंत
भल्याभल्यांना पोहोचता येत नाही, असे भ्रष्टाचाराने ऐकले होते, वाचले होते.
आताही तशीच परिस्थिती आहे का, याची 'टेस्ट' चि. उध्दवरावांकडे घेण्याचे
योजिले होते. पत्रकार मित्राने रात्रीच्या मैफलीत रात्री अकरानंतर
सांगितलेली गोष्ट म्हणजे 'ब्रह्मवाक्य' आहे, याचे प्रत्यंतर भ्रष्टाचाराला
अर्ध्या मिनिटात आले. 'अविनाश भोसले' हे दोन शब्द त्याच्या तोंडातून बाहेर
पडताच 'खुल जा सिमसिम'प्रमाणे उध्दवरावांच्या दालनाचे दरवाजे त्याच्यासाठी
उघडले गेले. आत नेते, उपनेते, विभागप्रमुख, शाखाप्रमुख अशा मंडळींच्या
गर्दीत चि. उध्दवराव बसलेले... चि. उध्दवराव आपल्या सैनिकांना पावसाळयात
नाले सफाई, रस्ते दुरुस्तीची टेंडर कशी मंजूर करायची याचे धडे देत होते.
लो, हायेस्ट अशी निविदांची बोली ऐकू येत होती. थोडया वेळाने सुटाबुटातील
काही खाशी मंडळी दालनात दाखल झाली. 'कुणाची किती टक्क्यांची ऑॅफर आहे?' अशी
भाषा भ्रष्टाचाराच्या कानी पडू लागली. काहीतरी सांकेतिक भाषेत बोलले जाऊ
लागले. हे काय चालले आहे हे भ्रष्टाचाराला कळेना. थोडया वेळाने 'झालं का
डील फायनल?' असे काहीतरी उध्दवरावांनी समोरच्या मंडळींना विचारले.
उपस्थितांनी माना डोलावल्या. शिववडा, चहाचा आस्वाद घेऊन मंडळी पांगली.
उध्दवरावांचे लक्ष कोपऱ्यात बसलेल्या भ्रष्टाचाराकडे गेले. ही व्यक्ती
आपल्याशी संबंधित नाही, हे त्यांच्या लगेच लक्षात आले. आता औपचारिक ओळख
वगैरे करून देण्या-घेण्याचा उपचार पूर्ण करण्याऐवजी भ्रष्टाचार स्वत:च
उठला. त्याने उध्दवरावांना आपली ओळख करून दिली. तुम्ही रागावल्याने आपण
येथवर आलो वगैरे गोष्टी त्याने सविस्तर सांगितल्या.
''मी तुमच्यावर रागावलो असं कोण म्हणालं?'' उध्दवरावांनी विचारले.
''अहो, तुम्हीच तर म्हणालात ना, जिकडे पाहावं तिकडे भ्रष्टाचारच दिसतोय म्हणून..''
''हो, म्हणालो ना. त्यात काय चुकलं?'' उध्दवरावांची पृच्छा.
''म्हणजे हे बघा, तुम्ही सगळयांना दर्शन
देता, मला मात्र देत नाही असं मला म्हणायचं होतं.'' एवढे बोलत उध्दवराव
खुर्चीतून उठले. भ्रष्टाचाराचा चेहरा अजूनही बावचळलेलाच दिसत होता.
उध्दवरावांनी काय दृष्टान्त दिला आहे, हे भ्रष्टाचाराच्या डोक्यात
शिरेपर्यंत उध्दवराव मातोश्रीबाहेर पडले होते.
No comments:
Post a Comment