राजकारणातल्या धबडग्यातून जरासाही मोकळा वेळ काढू न
शकणाऱ्या आंधीतल्या सुचित्रा सेन आणि वाहनांच्या गर्दीतून रस्ता काढीत,
कर्णकर्कश हॉर्नचा कानावर होणारा बलात्कार सहन करत दिवस ढकलणारे आपण
यात दीपकला खूपच साम्य वाटत असे. ऑफिसला जाताना येतानाच नव्हे तर किरकोळ,
किरकोळ कामासाठी गावात जावे लागणाऱ्या दीपकला प्रचंड दमायला व्हायचे.
त्याच्या घराबाहेरच्या रस्त्यावर पॅगो सहा आसनी रिक्षांचे आणि नियम धुडकावत
जाणाऱ्या नाना प्रकारच्या बाइकचे आवाज त्याला सहन करता यायचे नाहीत. या
गर्दीतून आपली दुचाकी दामटत असताना त्याला तीस चाळीस वर्षापूर्वीच्या
पुण्याची आठवण होऊ लागायची. आपला मुळचा शांत स्वभाव बाजूला टाकत वाहनांच्या
वेगाने धावणारे पुणे पाहून तो नेहमी भयचकित व्हायचा. आजच्या पिढीतल्या
मुलांना जुने पुणे इतके सुंदर होते हे ठाऊक होणार नाही या जाणीवेने त्याला
अस्वस्थ व्हायला व्हायचे. पुण्याच्या गर्दीचा वेग गाठताना
आपल्यासारख्याला धाप लागते मात्र तरुण पिढीला या गर्दीचे , गजबजाटाचे काहीच
कसे वाटत नाही याचे त्याला आश्चर्य वाटायचे. ३०- ४० वर्षांपूर्वी पुणे हे
खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय होते. तेंव्हा पुण्यातच नव्हे तर सांगली,
सोलापूर, सातारा, नगर , कोल्हापूर या आसपासच्या भागातही नवश्रीमंत नावाची
जमात जन्माला आली नव्हती. शिक्षक, सरकारी कारकून, बँक, एलआयसी ,
कम्प्न्यान्त्ले कारकून , आजूबाजूच्या बजाज, किर्लोस्कर या कम्प्न्यान्त्ले
कारकून हा वर्ग खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय होता. किराणा खरेदी करताना
रुपया दोन रुपया वाचविण्याची या वर्गाची धडपड असायची. त्यावेळी बजाज स्कूटर
साठी आणि टेलीफोनसाठी नंबर लावणे आणि जमलच तर एखादा फ्लॅट बुक करणे एवढीच
मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांची लक्ष्मणरेषा होती. शिक्षक एवढेच नव्हे तर
प्राध्यापकाचेही सायकल हेच वाहन होते. संध्याकाळी कामावरून घरी आले की पाय
मोकळे करायला लकडी पूल, शनिवार वाडा, पर्वतीपर्यंत जाणे, अधूनमधून नीलायम,
प्रभात, विजय हिंदी मराठी सिनेमे पाहणे , फारच चैन म्हणायची झाले तर टीळक
रोडवर नेहरू स्टेडियम बाहेर असलेल्या अप्सरा ला कटलेट खायला जाणे …
मध्यमवर्गीयांचे जीवन एवढे सुटसुटीत , मर्यादित आणि म्हणूनच छान होते.
सर्दी, खोकला असल्या किरकोळ आजारांवर औषध द्यायला फॅमिली डॉक्टर असायचे,
त्यावेळी सर्दी खोकला झाल्यावर सतराशे साठ टेस्ट करून घेण्यास सांगणारे
डॉक्टर अजून उदयाला आले नव्हते. हृद्य विकार, रक्त दाब, मधुमेह,
स्पोन्डिलायटीस अशा श्रीमंत आजारांनी त्यावेळी घरोघरी प्रवेश केलेला
नव्हता. त्यावेळी फुले मंडईत भाजीला जाताना होंडा , सुझुकी अशा दुचाक्या
घेऊन जाण्याची प्रथा रूढ झालेली नव्हती. भरपूर चालणे, सायकलिंग यांनी लहान
थोरांच्या तब्येती ठणठणीत होत्या.फॅमिली डॉक्टरचे बिल ही किराणा
दुकानदाराप्रमाणे महिन्याच्या महिन्याला चुकते व्हायचे. बहुतांश
मध्यमवर्गीयांची घरे भाड्याचीच असायची. वास्तुशास्त्र, फेंगशुई सारख्या
वास्तूंच्या शास्त्रांनी झपाटल नव्हतं. दुचाकी सुद्धा फार कमी लोकांकडे
असायची. त्यामुळे रात्रीची झोपमोड व्हायला कारचा रिव्हर्स हॉर्न वगैरे
भानगड नव्हती. एप्रिल मे मध्ये वसंत व्याख्यानमाला , मॅजेस्टीक गप्पा यांना
तुडुंब गर्दी व्हायची. एकूण काय तर गरजा मर्यादित मात्र अमर्यादित अशी
स्थिती असायची. त्या निवांत आयुष्यात , ' वेळच मिळत नाही ' अशी तक्रार
करायला कोणालाच जागा नव्हती. निवान्तप्णाचा आणि आनंदाचा सुखाचा प्याला
सुखाने एन्जॉय करता येत होता.
आता हे सगळं इतिहासजमा शालेय याची
जाणीव दीपक सरदेशमुख ला वारंवार छळायची. चिमणबागेतल्या चाळीत राहणाऱ्या
दिपकने आपल्या आयुष्याची जवळपास तीस वर्षे तेथे घालवली होती. आता गावात
राहणाऱ्या लोकांना पाय मोकळे करायला बाहेर पडावे म्हटले तर जीव मुठीत घेऊन
चालावे लागते. एखाद्या सुट्टीला पर्यटन स्थळी जावे म्हटलं तर तीही
माणसांच्या आणि वाहनांच्या गर्दीने गजबजलेली असतात. महाबळेश्वर, दिवेआगर,
गणपती पुळे, पन्हाळा. हरी हरेश्वर … कुठेही जा सगळीकडे पुणेकरांची गर्दी
असतेच. त्यात मोबाइल नामक कर्ण पिशाचाची भर पडलीय. शरीराने पुण्याबाहेर
गेलात तरी मोबाइल तुम्हाला त्याच धकाधकीत आणून सोडतो. असो. आता हे असंच
राहणार असे म्हणत दिपकने सुस्कारा टाकला. आजवर त्याने असे किती सुस्कारे
टाकले असतील कोणाला ठाऊक ?
चंद्रहास मिरासदार
No comments:
Post a Comment