Tuesday, 21 April 2015

उसोंका, द्राक्षोंका सबका कहना हैं, एक हजारोंमे मेरे काका हैं


आमचे काका आणि भविष्य, ज्योतिष यांचं घट्ट नातं आहे. स्मार्ट फोन आणि व्हॉट्स अप हे जसे ' एक दुजे के लिये ' आहेत तसंच आमचे काका आणि भविष्य ही 'रब ने बना दी जोडी' आहे.ये फेविकॉल का   जोड हैं, टुटेगा नही '. तुम्ही म्हणाल हे कसं बुवा ? तुमच्या काकांच्या हातात कधीच कुंडल्या, पत्रिका, जुनी दाते पंचांग दिसत  वगैरे वगैरे कोणतीच अवजारं दिसत नाहीत, तरीही आमच्या काकांचं भविष्य, ज्योतिषाशी जवळचं नातं कसं , असा रोकडा सवाल तुम्ही करणार हे मला ठाऊक आहे. पण आमच्या काकांना भविष्य वगैरे सांगायला जुनी पंचांग, कुंडल्या, पत्रिका वगैरे साहित्याची जरुरी भासत नाही. त्यांच्या डोक्यात अनेकांच्या कुंडल्या, पत्रिका फिट्ट बसल्या आहेत. कोणाच्या पत्रिकेत गुरु , शनी कोणत्या स्थानी आहेत हे आमच्या काकांना माहिती असतं. फक्त माणसांचेच नव्हे तर अन्न धान्याच्या, द्राक्ष, डाळीम्बासारख्या फळांच्या , उसासारख्या पिकांचे भविष्य आमचे काका सांगत असतात. म्हणजे चालू वर्षी गहू , ज्वारीचे एवढे उत्पादन होणार , म्हणून गहू, ज्वारीचे भाव कमी होणार , वाढणार, उसाचे कमी उत्पादन होणार असल्याने साखरेचे भाव वगैरे वाढणार वगैरे वगैरे भविष्य आमचे काका सांगत असतात. तर अशा आमच्या काकांच्या स्वत:च्या भविष्याबद्दल कोणालाच काही सांगता येत नाही. म्हणजे ते केंव्हा कोणता निर्णय घेतील, रस्त्याच्या उजव्या बाजूने चालतील की डाव्या बाजूने की सरळ न जाता एकदम मागे फिरतील हे कोणीच सांगू शकत नाही. त्यांच्या साथीत चालणाऱ्या माणसालाही ते केंव्हा कोठे वळतील हे सांगता येत नाही. तर असे आमचे काका राजकारणातले थोर अष्टपैलू खेळाडू आहेत. फलंदाजी, गोलंदाजी,क्षेत्ररक्षण एवढेच नव्हे तर ते यष्टीरक्षणही छान जमतं. आपल्याच संघातील धावबाद करणे या सारखे खेळ त्यांना उत्तम जमतात असे त्यांचे मित्रच सांगतात. समजा काका फलंदाजी करत असले आणि एखाद्या लांब मारलेल्या फटक्यावर त्यांना धाव घ्यायची आहे असेल तर ते आपल्या नॉन स्ट्रायकर साथीदाराला धाव घेण्याची खून करतील मात्र त्याच्या नकळत प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्ररक्षकालाही खूण करतील. ही खूण कोणाच्याच लक्षात येत नाही. प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्ररक्षकाला केलेल्या खुणेमुळे काकांचा सहकारी फलंदाज धावबाद होत असे. या साथीदार फलंदाजाला काकानी क्षेत्ररक्षकालाही खून केली होती हे फार उशीरा लक्षात येत असे, तो पर्यंत तो साथीदार तंबूत परतलेला असे. असो. आमचे काका गोलंदाजीला उतरतात तेंव्हा काही वेळा ते ४०- ५० पावलांचा स्टार्ट घेतात. एवढा लांबलचक स्टार्ट पाहून प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या छातीत धडकीच भरते. त्याला वाटायचे आपल्या दिशेने आता बाउन्सर येणार पण कसचे काय काका एवढ्या लांबून पळत येउन काका अंडर आर्म बॉल टाकत असतात. असा बॉल कसा खेळायचा हे फलंदाजाला ठाऊक नसल्याने तो हमखास बाद होतो. प्रत्यक्ष क्रिकेटप्रमाणे राजकारणात अंडर आर्म चेंडू टाकायला बंदी नाहीये. कधी कधी सामना चुरशीचा होणार असे वाटत असतानाच ते प्रतिस्पर्धी संघाला पूर्ण षटके फलंदाजी करू देणे कसे हिताचे आहे हे सांगू लागतात. असे झाल्यावर सामन्यातील इंटरेस्ट संपून जातो असे त्यांच्या संघातलेच लोक म्हणतात. आमचे काका फिरकी गोलंदाजी करायला येतात तेंव्हा एक पाउल सुद्धा स्टार्ट घेत नाहीत , स्टंपाजवळ उभे राहून ते उंची दिलेला चेंडू टाकतात. असा एकदम हळू वेगाने टाकलेला चेंडू टप्पा पडल्यावर एकदम डोक्याच्या उंचीने उसळत असे. अनेक फलंदाजांना ही भुताटकी वाटत असे . शेन वॉर्न, मुरलीधरन यांच्या सारख्या गोलंदाजांनी त्यांच्याकडे हा ' चौथा ' नामक चेंडू कसा टाकावा या साठी शिकवणी लावली आहे असे कळते. काही वेळा काका आपल्या मूळ गावी ' बारामती ' ला जाण्यासाठी निघत, त्यांना सोडायला त्यांचे सहकारी, पाहुणे बस स्थानकावर जात असत. काका 'बारामती' ला जाणाऱ्या विना वाहक विना थांबा बस मध्ये बसत असत. पण त्यांना सोडायला आलेले सहकारी, पाहुणे गेल्यावर हे बारामतीची गाडी सोडून साबरमती च्या गाडीत हळूच बसत असत. तर असे हे काका. त्यांचे भविष्य, ज्योतिष यांचे नाते किती घट्ट आहे हे सांगण्यासाठी ही उदाहरणे दिली तर असे हे काका पर्वा वांद्र्यात गेले होते. वांद्र्यात जाउन त्यांनी ' नारायणराव येणार , फडणवीस सरकार जाणार पडणार ' असे भविष्य वर्तवले. नारायणरावांसाठी त्यांनी वांद्र्यात जाउन सभा घेतली. खरे तर त्या आधी काकांच्या बारामतीत माळेगाव ची इलेक्शन होती. तिकडे काका फिरकले देखील नाहीत. आपल्या घरचे कार्य सोडून ते शेजारच्या घरातल्या पोराच्या सोडमुंजेसाठी धावत गेले. नारायणरावांचे पाहुणेदेखील या सोडमुंजेला आले नव्हते. असो. बोहल्यावर चढलेल्या नारायणरावांना त्यांच्या मागे उभ्या राहिलेल्या मित्रांनी उचलून घेतले तरी आमदार सुंदरीच्या गळ्यात वरमाला घालता आली नाही. काकांचे भविष्य पुन्हा एकदा चुकले. पण एवढे झाले तरी आमचे काका नाराज झाले नाहीत. त्यांचा भविष्य सांगण्याचा खेळ चालूच आहे. परवा त्यांच्याकडे अजितदादा पवार नामक व्यक्ती आपल्या घड्याळाची पत्रिका घेऊन आली होती म्हणे. कितीही दुरुस्त केले तरी त्यांचे घड्याळ बंद पडतेय म्हणतात. अजितदादांना आमच्या काकांनी काय भविष्य सांगितले हे अजून कळले नाही.
- चंद्रहास मिरासदार

Saturday, 4 April 2015

हंगर अच्छें अच्छें को बदल देता है

चि. उद्धवराव, राजूभाऊ, सदाभाऊ, शीघ्र कवी सम्राट रामदासजी एकमेकांकडे पहात बसली आहेत. सदाभाऊ, राजाभाऊ, रामदासजी यांचे चेहरे भुकेने कासावीस झाले आहेत. न्याहरीची वेळ कधीच संपली आहे, जेवणाचीही वेळ टळून गेलेली आहे. एवढे होऊनही एखादे ताट, डिश येत नाहीये हे पाहून मंडळी अस्वस्थ आहेत. चि. उद्धवरावांच्या चेहऱ्यावर ' थोडा है , थोडे की जरुरत है ' असे काही तरी भाव दिसताहेत. भुकेने अस्वस्थ झालेले तिघे येरझाऱ्या मारताहेतं. मात्र चि. उद्धवराव जागेवरच बसून आहेत. कदाचित आपण जागेवरून उठलो तर आपण बसलोय ती जमीन सुद्धा संपादन केली जाइल अशी भीती त्यांना वाटते आहे. तसे झाले तर आपले डे लाईफ सुद्धा कठीण होईल अशी भावना  त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवते आहे. एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहूनही या मंडळींना आता कंटाळा येऊ लागला आहे. शेवटी राजाभाऊ हातकणंगलेकर उठतात आणि हातातले उसाचे कांडके गुडघ्यावर काडदिशी मोडतात आणि ऊस खाण्यास सुरुवात करतात. क़ाय करणार ' हंगर अच्छे अच्छे को बदल देता है '. पाच मिनिटातच ते ऊस संपवून टाकतात. उसाच्या चुइट्या सर्वत्र पसरलेल्या आहेत. त्यांचा चेहऱ्यावरील अस्वस्थतेची जागा आता संतापाने घेतलीय. आपण मागितलेली ' एफआरपी' न मिळाल्याने आधीच कावलेले सदाभाऊ राजुभाऊंकडे बारिक लक्ष ठेवून आहेत. राजूभाऊ चिडलेले आहेत, त्यांना आणखी डिवचण्याची हीच वेळ आहे हे लक्षात आल्याने सदाभाऊ उठतात. त्यांच्या आडूनच आपल्याला एखादी डिश मिळणार आहे हे त्यांना ठाऊक आहे.
' भाऊ किती दिवस रहायचं या घरात . आपल्याला काही स्वाभिमान आहे की नाही ?' सदाभाऊ मोठमोठ्याने बोलू लागतात. चिडलेल्या सदाभाऊंकडे उद्धवराव मिशीतल्या मिशीत हसत असावेत अशी शंका पाहणाऱ्याला आली असती. उद्धवरावांच्या मनातील भावना सदाभाऊंच्या कदाचित लक्षात आल्या असाव्यात.
' काय हसताय राव तुम्ही. तुमचं बरंय, तुम्हाला स्टार्टर तरी आलंय. आमचं अजून ताटच वाढायला घेतलेलं नाही,' सदाभाऊंच्या शब्दा शब्दातून वैताग प्रकट होतो आहे.
' अरे माझ्यापेक्षा तुमचंच चांगलंय. स्टार्टर देऊन किती वेळ बसवलंय आम्हाला. त्या स्टार्टरनं भूक जाम चाळवलीय. ' उद्धवराव फुसफुस चालू करतात.
' स्टार्टर मिळाल्यानंतर मेन कोर्स लवकर आला नाही तर पोटाचे काय हाल होतात हे तुम्हाला कळणार नाही , सदाभाऊ ' हा संवाद फेकताना उद्धवराव मान हलवत राहतात.
' मला या घरातून पळून जावंसं वाटायला लागलंय. ' राजूभाऊ आपले मौन सोडतात.
' तुमचं म्हणणं खरंय, पण इचलकरंजीत जाउन काय करायचं तरी काय ? तथ जाउन टाळ कुटत बसावं लागल' मगाचा ॲन्ग्रि यंग मॅन् चा लुक बदलत सदाभाऊ बोलू लागतात.
' तुझं म्हणणं खरंय, पण नुसत्या ' वासा' वर किती दिवस रहायचं ?' राजुभाऊंचा सवाल.
इतका वेळ हा संवाद शांतपणे ऐकणारे शीघ्र काव्य सम्राट रामदासजी आठवले आपलं जाकीट सावरत उठतात आणि बोलू लागतात.
' स्वाभिमानाने बसावे, स्वाभिमानाने उठावे
मंत्री होणार होणार म्हणत शांतपणे झोपावे
बाहेर जाउन कोठे रहावे ? कशाला उन्हात अंग भाजून काढावे ?
रामदासजी आठवले यांची अती शीघ्र कविता ऐकून राजूभाऊ चांगलेच गोरेमोरे होतात.
' मी जर तुमच्याजागी असतो तर केंव्हाच पळून गेलो असतो. ' चि. उद्धवराव फुसकुली सोडतात. उद्धवरावांचे बोलणे ऐकून राजुभाऊ ताडकन उठतात आणि आपली बॅग भरू लागतात. आता नक्कीच काही तरी होणार या अपेक्षेने उद्धवरावांचे डोळे लकाकू लागतात.
' सदाभाऊ , तुम्हाला यायचं असंल तर चला, मी चाललो 'असे म्हणत  राजूभाऊ पायात चपला सरकावू लागतात. त्यांचं बोलण ऐकल्यावर सदाभाउंची चुळबुळ चालू होते. ही परिस्थिती पाहून रामदासजी पुन्हा आपली कवितेची नॉन स्टॉप् एक्स्प्रेस चालू करतात.
' सदाभाऊ अशा मित्रांपासून सावध राहू '
जे तुम्हाला म्हणतात , चला घर सोडून जाऊ '
आपण गेलो तर ह्यांचंच फावणार,
आपल्या नावाखाली हेच लोणी खाणार '
रामदास्जींचे काव्य ऐकून राजूभाऊ भरलेली बॅग पुन्हा खाली ठेवतात.
- चंद्रहास मिरासदार