Saturday, 4 April 2015

हंगर अच्छें अच्छें को बदल देता है

चि. उद्धवराव, राजूभाऊ, सदाभाऊ, शीघ्र कवी सम्राट रामदासजी एकमेकांकडे पहात बसली आहेत. सदाभाऊ, राजाभाऊ, रामदासजी यांचे चेहरे भुकेने कासावीस झाले आहेत. न्याहरीची वेळ कधीच संपली आहे, जेवणाचीही वेळ टळून गेलेली आहे. एवढे होऊनही एखादे ताट, डिश येत नाहीये हे पाहून मंडळी अस्वस्थ आहेत. चि. उद्धवरावांच्या चेहऱ्यावर ' थोडा है , थोडे की जरुरत है ' असे काही तरी भाव दिसताहेत. भुकेने अस्वस्थ झालेले तिघे येरझाऱ्या मारताहेतं. मात्र चि. उद्धवराव जागेवरच बसून आहेत. कदाचित आपण जागेवरून उठलो तर आपण बसलोय ती जमीन सुद्धा संपादन केली जाइल अशी भीती त्यांना वाटते आहे. तसे झाले तर आपले डे लाईफ सुद्धा कठीण होईल अशी भावना  त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवते आहे. एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहूनही या मंडळींना आता कंटाळा येऊ लागला आहे. शेवटी राजाभाऊ हातकणंगलेकर उठतात आणि हातातले उसाचे कांडके गुडघ्यावर काडदिशी मोडतात आणि ऊस खाण्यास सुरुवात करतात. क़ाय करणार ' हंगर अच्छे अच्छे को बदल देता है '. पाच मिनिटातच ते ऊस संपवून टाकतात. उसाच्या चुइट्या सर्वत्र पसरलेल्या आहेत. त्यांचा चेहऱ्यावरील अस्वस्थतेची जागा आता संतापाने घेतलीय. आपण मागितलेली ' एफआरपी' न मिळाल्याने आधीच कावलेले सदाभाऊ राजुभाऊंकडे बारिक लक्ष ठेवून आहेत. राजूभाऊ चिडलेले आहेत, त्यांना आणखी डिवचण्याची हीच वेळ आहे हे लक्षात आल्याने सदाभाऊ उठतात. त्यांच्या आडूनच आपल्याला एखादी डिश मिळणार आहे हे त्यांना ठाऊक आहे.
' भाऊ किती दिवस रहायचं या घरात . आपल्याला काही स्वाभिमान आहे की नाही ?' सदाभाऊ मोठमोठ्याने बोलू लागतात. चिडलेल्या सदाभाऊंकडे उद्धवराव मिशीतल्या मिशीत हसत असावेत अशी शंका पाहणाऱ्याला आली असती. उद्धवरावांच्या मनातील भावना सदाभाऊंच्या कदाचित लक्षात आल्या असाव्यात.
' काय हसताय राव तुम्ही. तुमचं बरंय, तुम्हाला स्टार्टर तरी आलंय. आमचं अजून ताटच वाढायला घेतलेलं नाही,' सदाभाऊंच्या शब्दा शब्दातून वैताग प्रकट होतो आहे.
' अरे माझ्यापेक्षा तुमचंच चांगलंय. स्टार्टर देऊन किती वेळ बसवलंय आम्हाला. त्या स्टार्टरनं भूक जाम चाळवलीय. ' उद्धवराव फुसफुस चालू करतात.
' स्टार्टर मिळाल्यानंतर मेन कोर्स लवकर आला नाही तर पोटाचे काय हाल होतात हे तुम्हाला कळणार नाही , सदाभाऊ ' हा संवाद फेकताना उद्धवराव मान हलवत राहतात.
' मला या घरातून पळून जावंसं वाटायला लागलंय. ' राजूभाऊ आपले मौन सोडतात.
' तुमचं म्हणणं खरंय, पण इचलकरंजीत जाउन काय करायचं तरी काय ? तथ जाउन टाळ कुटत बसावं लागल' मगाचा ॲन्ग्रि यंग मॅन् चा लुक बदलत सदाभाऊ बोलू लागतात.
' तुझं म्हणणं खरंय, पण नुसत्या ' वासा' वर किती दिवस रहायचं ?' राजुभाऊंचा सवाल.
इतका वेळ हा संवाद शांतपणे ऐकणारे शीघ्र काव्य सम्राट रामदासजी आठवले आपलं जाकीट सावरत उठतात आणि बोलू लागतात.
' स्वाभिमानाने बसावे, स्वाभिमानाने उठावे
मंत्री होणार होणार म्हणत शांतपणे झोपावे
बाहेर जाउन कोठे रहावे ? कशाला उन्हात अंग भाजून काढावे ?
रामदासजी आठवले यांची अती शीघ्र कविता ऐकून राजूभाऊ चांगलेच गोरेमोरे होतात.
' मी जर तुमच्याजागी असतो तर केंव्हाच पळून गेलो असतो. ' चि. उद्धवराव फुसकुली सोडतात. उद्धवरावांचे बोलणे ऐकून राजुभाऊ ताडकन उठतात आणि आपली बॅग भरू लागतात. आता नक्कीच काही तरी होणार या अपेक्षेने उद्धवरावांचे डोळे लकाकू लागतात.
' सदाभाऊ , तुम्हाला यायचं असंल तर चला, मी चाललो 'असे म्हणत  राजूभाऊ पायात चपला सरकावू लागतात. त्यांचं बोलण ऐकल्यावर सदाभाउंची चुळबुळ चालू होते. ही परिस्थिती पाहून रामदासजी पुन्हा आपली कवितेची नॉन स्टॉप् एक्स्प्रेस चालू करतात.
' सदाभाऊ अशा मित्रांपासून सावध राहू '
जे तुम्हाला म्हणतात , चला घर सोडून जाऊ '
आपण गेलो तर ह्यांचंच फावणार,
आपल्या नावाखाली हेच लोणी खाणार '
रामदास्जींचे काव्य ऐकून राजूभाऊ भरलेली बॅग पुन्हा खाली ठेवतात.
- चंद्रहास मिरासदार

No comments:

Post a Comment