Friday, 31 July 2015

उपमा आणि साहेब
भगवान शंकर नेहमीप्रमाणे पृथ्वीचा फेरफटका मारायला निघाले आहेत. पार्वती बरोबर आहेच. पृथ्वीचा फेरफटका मारताना हल्ली त्यांना विहिरीत कुऱ्हाड पडली म्हणून डोक्याला हात लावून बसलेला लाकूडतोड्या दिसत नव्हता. याचं कारण कुऱ्हाड बुडण्याएवढं पाणी असणाऱ्या विहीरीच राहिलेल्या नव्हत्या. समजा खरंच एखादा लाकुडतोड्या विहिरीत कुऱ्हाड पडली म्हणून बसलेला दिसला तर अडचण नको म्हणून शंकराने आपल्या बरोबर नॅनो जेसीबी मशीनहि घेऊन ठेवले होते. पृथ्वीचा हवाई फेरफटका मारताना अपेक्षेप्रमाणे त्यांना कुऱ्हाड विहिरीत पडलेला लाकुडतोड्या कुठेच दिसला नाही. मानवाला मदत करण्याचा योग आज आपल्या कुंडलीत नाही असे शंकराला वाटू लागले. तेवढ्यात त्यांचे लक्ष ऊसाच्या शेताशेजारी उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेले.
शंकराचे विमान हळूहळू खाली येते. ऊसाच्या शेताच्या बाजूला चिंताक्रांत चेहऱ्याने उभ्या असलेल्या माणसाच्या जवळ विमान उभे राहते. शंकर, पार्वती खाली उतरतात. साक्षात शंकराला पाहून त्या माणसाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.पण त्याला विश्वास ठेवणे भाग पडते. 
' बोल वत्सा, कसली काळजी पडली आहे तुला ' भगवान शंकर आत्यंतिक प्रेमळ स्वरात विचारतात. 
' देवा अगदी वेळेवर आलास बघ. लाकूडतोड्याला कुऱ्हाड काढून दिल्याची गोष्ट लहानपणापासून ऐकत आलोय मी. मलाही तशीच मदत कर देवा ' चिंताक्रांत चेहऱ्याचा माणूस कळवळीने शंकराला सांगतो. 
' अगदी मोकळेपणे सांग. तुझ्यासारख्या माणसांसाठी तर आम्ही चोवीस तास हेल्पलाईन चालू केली आहे. कुठे पडली आहे तुझी कुऱ्हाड  '  भगवान शंकर अजून लाकूडतोद्याच्या गोष्टीतून बाहेर आलेले नसतात. 
' माझी कुऱ्हाड पडली नाहीये' 
' मग काही हरवलंय का ' 
' काही नाही हरवलंय.'
' मग काय प्रॉब्लेम आहे तुझा ?' 
' माझी जीभ सारखी घसरतीय हो अलीकडे ' त्या माणसाने आप प्रॉब्लेम एकदाचा सांगितला. 
' पाउल घसरत हे ऐकून माहित होतं. पण जीभहि घसरते हे पहिल्यादांच ऐकतोय. हा काय प्रकार आहे वत्सा ' 
' पाऊल घसरण्यासारखा प्रकार नाहीये हो हा ' शंकराला कसे समजावून सांगावे असा प्रश्न त्या माणसापुढे पडतो. मग काही विचार करून तो बोलू लागतो. 
' या प्रकाराला स्लीप ऑफ टंग असे म्हणतात. यात काय होत, त्या माणसाचा आपल्या तोंडावर ताबाच रहात नाही. '
भगवान शंकर त्या माणसाला आपादमस्तक न्याहाळतात. सवयीप्रमाणे पार्वती नवऱ्याच्या मनात काय चालले आहे हे ओळखते. 
' अहो त्यांचा ' खाण्या ' वर ताबा नाही असं त्यांना म्हणायचं नाही. त्यांचा त्यांच्या बोलण्यावर ताबा राहिलेला नाही असं त्यांना सांगायचेय ' पार्वती आपल्या पतिराजांना सांगते. हे ऐकून तो माणूस बरोबर आहे अशा अर्थाने आपली मान हलवतो. 
  शंकराला या स्लीप ऑफ टंग झालेल्या इसमाबद्दल कुतूहल वाटू लागते. ते त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहू लागतात. काही क्षणातच त्या इसमाची कुंडली शंकराच्या मन:चक्षू समोर उभी राहते. सदरहू इसमाचा अलीकडे आपल्या बोलण्यावर ताबा राहिलेला नाही हे शंकराच्या लक्षात येते. सदर व्यक्ती अलीकडे वारंवार मध्यावधी निवडणुकीचे भजन म्हणू लागली आहे असेही भगवान शंकराला दिसते. साहेब म्हणून परिचित असणाऱ्या या व्यक्तीने आपल्या मुंब्रा स्थित जितेंद्र नामक एका सहकाऱ्याला सुविद्य, सुशीक्षीत अशा उपमा दिल्याने भूतलावर हास्य स्फोट होऊ लागले आहेत. लोक हसून हसून गडाबडा लोळू लागले आहेत.  या हास्यस्फोटाचे जनतेवर भयंकर परिणाम झालेले आहेत. आपली काम धामे सोडून लोक हसतच बसले आहेत. एकूणच भूतलावर साहेबांच्या उपमा नामक गृह उद्योगाने अनर्थ माजला आहे. आपण असे काही आहोत हे जितेंद्र नामक व्यक्तीलाही ठाऊक नव्हते. त्यामुळे त्या व्यक्तीलाही आपल्याबाबत साहेब नामक व्यक्तीने दिलेल्या उपमेमुळे जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. आपल्यात एवढे दुर्गुण आहेत आणि साहेब नामक व्यक्तीने आपल्याला हे आधीच न सांगितल्याबद्दल चि. जितेंद्र याला साहेब नामक इसमाचा भयंकर राग आला आहे. आता साहेब या व्यक्तीला आपण काय बोलून गेलो हे कळले आहे. उपमा देण्याची ही सवय अशीच राहिली तर आपण छगन नामक इसमाला 'दारिद्र्य रेषेखालील माणूस ' अशी उपाधी देऊ अशी भीती साहेबांना वाटू लागली आहे … साहेब नामक इसमाची कुंडली मन:चक्षुपुढे दिसल्यावर शंकराला त्या माणसाच्या प्रॉब्लेम वर काय औषध द्यावे हे लक्षात येत नाही.  
' वत्सा, तू विहिरीत काय समुद्रात सापडलेली कुऱ्हाड काढून देईन. मात्र ही तुझी घसरलेली जीभ शोधणे महाअवघड आहे. ' असं म्हणत भगवान शंकर पार्वतीसह आपल्या विमानातून निघून जातात.
चंद्रहास मिरासदार

Friday, 17 July 2015

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम

भ्रष्टाचाराला आज आपला खूप खूप अभिमान वाटू लागला होता. याला कारण तसेच घडले होते. स्वच्छ कारभाराचे ब्रँड ऍंबॅसिडर ठाकरे कुलवंशीय श्रीमान उध्दवराव यांनाही भ्रष्टाचाराचे दर्शन घडले होते. 'बघावं तिकडे भ्रष्टाचार दिसतो आहे' असे उध्दवराव म्हणाल्याचे भ्रष्टाचाराने आपल्या सुपाएवढया कानांनी ऐकले होते. उध्दवराव हा एक सरळ, भला माणूस म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द होता. त्याचे पाऊल कधीच वाकडे पडायचे नाही. त्याचे पाऊल वाकडे पडू नये यासाठी पांढऱ्या शुभ्र पैशाचे उत्पादक असलेले अविनाशजी भोसले यांनी 'पांडव' नामक आपले हेलीकॉप्टर उध्दवरावांच्या सेवेस हजर ठेवले होते. याच वाहनातून उध्दवरावांना गड-किल्ल्यांची छायाचित्रे काढता येत असत. असो. अशा उध्दवरावांनी आपले 'नाव घेतले' याचा भ्रष्टाचाराला कोण म्हणून आनंद झालेला होता. याच आनंदात तो उध्दवरावांना भेटण्यास निघालेला होता. मातोश्री नामक उध्दवरावांच्या सदनिकेत तो सक्काळी सक्काळीच दाखल झाला. पाहतो तर तेथे तोबा गर्दी उसळलेली. आपल्याला या गर्दीतून उध्दवरावांना भेटावयास मिळणार का? असे त्याला वाटू लागले. दालनाबाहेर 'जय-विजय' अशा दोघांच्या भूमिका एकटेच सांभाळणारे मिलिंदराव नार्वेकर मुंगीलासुध्दा शिरू देत नव्हते. बडया राजकीय मंडळींकडे किंवा अधिकाऱ्यांकडे जायचे असेल, तर अविनाश भोसले या 'मास्टर की'चे नाव घ्यायचा अवकाश, तुमच्यासाठी सर्व गड-कोटांचे दरवाजे किलकिले नव्हे, तर सताड उघडे होतात, असे भ्रष्टाचाराला एका पत्रकाराने खात्रीपूवक सांगितले होते. अविनाश भोसले ही मास्टर-की असेल, तर संजयनाना काकडे नामक 'बनवून आणलेली किल्ली'सुध्दा या लोकांकडे जाताना उपयोगी ठरते, असेही त्याला पत्रकार मित्राने सांगितले होते. पत्रकार मित्राने रात्रीच्या मैफलीत रात्री अकरानंतर सांगितलेले किती खरे आहे, याची चाचणी घेण्याचे भ्रष्टाचाराने ठरविले. पहिला प्रयोग चि. उध्दवरावांकडे करण्याचे ठरविले. कारण एक वेळ राष्ट्रपती, पंतप्रधानांनासुध्दा भेटणे शक्य आहे; पण चि. उध्दवरावांभोवती नार्वेकर नामक 'चायना...' चुकलो, 'मालवणी वॉल' असल्याने त्यांच्यापर्यंत भल्याभल्यांना पोहोचता येत नाही, असे भ्रष्टाचाराने ऐकले होते, वाचले होते. आताही तशीच परिस्थिती आहे का, याची 'टेस्ट' चि. उध्दवरावांकडे घेण्याचे योजिले होते. पत्रकार मित्राने रात्रीच्या मैफलीत रात्री अकरानंतर सांगितलेली गोष्ट म्हणजे 'ब्रह्मवाक्य' आहे, याचे प्रत्यंतर भ्रष्टाचाराला अर्ध्या मिनिटात आले. 'अविनाश भोसले' हे दोन शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडताच 'खुल जा सिमसिम'प्रमाणे उध्दवरावांच्या दालनाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले गेले. आत नेते, उपनेते, विभागप्रमुख, शाखाप्रमुख अशा मंडळींच्या गर्दीत चि. उध्दवराव बसलेले... चि. उध्दवराव आपल्या सैनिकांना पावसाळयात नाले सफाई, रस्ते दुरुस्तीची टेंडर कशी मंजूर करायची याचे धडे देत होते. लो, हायेस्ट अशी निविदांची बोली ऐकू येत होती. थोडया वेळाने सुटाबुटातील काही खाशी मंडळी दालनात दाखल झाली. 'कुणाची किती टक्क्यांची ऑॅफर आहे?' अशी भाषा भ्रष्टाचाराच्या कानी पडू लागली. काहीतरी सांकेतिक भाषेत बोलले जाऊ  लागले. हे काय चालले आहे हे भ्रष्टाचाराला कळेना. थोडया वेळाने 'झालं का डील फायनल?' असे काहीतरी उध्दवरावांनी समोरच्या मंडळींना विचारले. उपस्थितांनी माना डोलावल्या. शिववडा, चहाचा आस्वाद घेऊन मंडळी पांगली. उध्दवरावांचे लक्ष कोपऱ्यात बसलेल्या भ्रष्टाचाराकडे गेले. ही व्यक्ती आपल्याशी संबंधित नाही, हे त्यांच्या लगेच लक्षात आले. आता औपचारिक ओळख वगैरे करून देण्या-घेण्याचा उपचार पूर्ण करण्याऐवजी भ्रष्टाचार स्वत:च उठला. त्याने उध्दवरावांना आपली ओळख करून दिली. तुम्ही रागावल्याने आपण येथवर आलो वगैरे गोष्टी त्याने सविस्तर सांगितल्या.
''मी तुमच्यावर रागावलो असं कोण म्हणालं?'' उध्दवरावांनी विचारले.
''अहो, तुम्हीच तर म्हणालात ना, जिकडे पाहावं तिकडे भ्रष्टाचारच दिसतोय म्हणून..''
''हो, म्हणालो ना. त्यात काय चुकलं?'' उध्दवरावांची पृच्छा.
''म्हणजे हे बघा, तुम्ही सगळयांना दर्शन देता, मला मात्र देत नाही असं मला म्हणायचं होतं.'' एवढे बोलत उध्दवराव खुर्चीतून उठले. भ्रष्टाचाराचा चेहरा अजूनही बावचळलेलाच दिसत होता. उध्दवरावांनी काय दृष्टान्त दिला आहे, हे भ्रष्टाचाराच्या डोक्यात शिरेपर्यंत उध्दवराव मातोश्रीबाहेर पडले होते.

Sunday, 5 July 2015

चला ' हवा' येऊ द्या

सकाळची साडे नऊ - दहाची वेळ…. वाहनांच्या गर्दीने तुडुंब भरलेला रस्ता …  दुचाकी धारकांच्या झुंडीच्या झुंडी त्या चौकात येउन आदळत होत्या ….त्यात भर पडत होती ती सहा आसनी रिक्षा , बस, चारचाकींची. या गर्दीचा एक भाग बनलेल्या दीपक सरदेशमुख ला ही गर्दी असह्य व्हायची. मात्र दररोजच त्याला या गर्दीचा नाइलाजाने भाग बनावे लागायचे. पन्नाशी नुकतीच ओलांडलेल्या दीपक ला या वाहनांच्या गर्दीचा महासागर दररोज पार करून जावे लागे. श्वास घुसमटून टाकणारी ही गर्दी त्याच्या आयुष्याचा भाग बनून गेली होती. सकाळी आणि संध्याकाळी ऑफिसला जाताना आणि येताना या गर्दीतून मार्ग काढताना त्याला ब्रह्मांड आठवे. संध्याकाळी घरी परतल्यावर चहा घेत असताना आपल्या यांत्रिक जीवनाची त्याला मनस्वी चीड येत असे. मोकळा श्वास सुद्धा घेण्याची परवानगी न ठेवलेल्या या गर्दी आणि कोलाहलाने आपल्या अंगातला चैतन्य, उत्साह यांचा रस शोषून घेतला आहे असे त्याला नेहमी वाटायचे. या आयुष्याच्या नावाने सुस्कारे टाकीत चहा संपवणे आणि फिरायला निघणे हाही त्याच्या आयुष्य्क्रमाचा भाग बनला होता. आपली ही अवस्था पाहून त्याला 'आंधी' मधल्या संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांच्यातल्या एका प्रसंगातील संवादाची हटकून आठवण व्हायची. वडिलांच्या आग्रहापोटी राजकारणात पडावे लागलेल्या सुचित्रा सेन ला आपल्या पतीपासून वेगळे राहण्याशिवाय पर्यायच उरत नाही. पतीने म्हणजे संजीवकुमारने तिच्यापुढे राजकारण किंवा संसार असा पर्याय ठेवलेला असतो. ती राजकारणात गेल्यावर दोघे मनाने विभक्त होतात.राजकारणाच्या धबडग्यात सुचित्रा सेन व्यग्र होऊन जाते. एका निवडणुकीच्या प्रचारासाठी ती संजीवकुमार रहात असलेल्या गावात येते आणि तो व्यवस्थापक असलेल्या हॉटेल मध्येच उतरते. तिला आपला पती त्या हॉटेल चा व्यवस्थापक आहे हे ठाऊकच नसते. कळाल्यावर ती स्वत:हून त्याच्या घरी जाते. नऊ वर्षांनी ते दोघे एकमेकांना भेटत असतात. जेवण वगैरे झाल्या नंतर दोघे गावाजवळच्या एका बागेत जातात. बागेतील फुले, कारंजी या विषयी संजीवकुमार भरभरून सांगत असतो. रात्रीची वेळ असल्याने वातावरणात विलक्षण शांतता असते.बागेतील फुले,  कारंजी या विषयी सांगणाऱ्या संजीव कुमारला अडवून सुचित्रा सेन म्हणते ,' कहा आ पाउंगी मैं,'  तू हे सगळं सांगतो आहेस खरे पण मला  राजकारणातल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून मला बागेत बिगेत जायला कधीच जमणार नाही असा तिच्या बोलण्याचा सूर असतो. तेंव्हा तिच्याकडे पहात किंचितस हसत आकाशातल्या चंद्राकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, ' ये जो चांद हैं ना इसे रात में देखना ये दिन में निकलता नही ' 
राजकारणातल्या धबडग्यातून जरासाही मोकळा वेळ काढू न शकणाऱ्या आंधीतल्या सुचित्रा सेन आणि वाहनांच्या गर्दीतून रस्ता काढीत, कर्णकर्कश हॉर्नचा कानावर होणारा बलात्कार सहन करत दिवस ढकलणारे आपण यात  दीपकला खूपच साम्य वाटत असे. ऑफिसला जाताना येतानाच नव्हे तर किरकोळ, किरकोळ कामासाठी गावात जावे लागणाऱ्या दीपकला प्रचंड दमायला व्हायचे. त्याच्या घराबाहेरच्या रस्त्यावर पॅगो सहा आसनी रिक्षांचे आणि नियम धुडकावत जाणाऱ्या  नाना प्रकारच्या बाइकचे आवाज त्याला सहन करता यायचे नाहीत. या गर्दीतून आपली दुचाकी दामटत असताना त्याला तीस चाळीस वर्षापूर्वीच्या पुण्याची आठवण होऊ लागायची. आपला मुळचा शांत स्वभाव बाजूला टाकत वाहनांच्या वेगाने धावणारे पुणे पाहून तो नेहमी भयचकित व्हायचा. आजच्या पिढीतल्या मुलांना जुने पुणे इतके सुंदर होते हे ठाऊक होणार नाही या जाणीवेने त्याला अस्वस्थ व्हायला व्हायचे. पुण्याच्या गर्दीचा वेग गाठताना आपल्यासारख्याला धाप लागते मात्र तरुण पिढीला या गर्दीचे , गजबजाटाचे काहीच कसे वाटत नाही याचे त्याला आश्चर्य वाटायचे. ३०- ४० वर्षांपूर्वी पुणे हे खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय होते. तेंव्हा पुण्यातच नव्हे तर सांगली, सोलापूर, सातारा, नगर , कोल्हापूर या आसपासच्या भागातही नवश्रीमंत नावाची जमात जन्माला आली नव्हती. शिक्षक, सरकारी कारकून, बँक, एलआयसी , कम्प्न्यान्त्ले कारकून , आजूबाजूच्या बजाज, किर्लोस्कर या कम्प्न्यान्त्ले कारकून हा वर्ग खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय होता. किराणा खरेदी करताना रुपया दोन रुपया वाचविण्याची या वर्गाची धडपड असायची. त्यावेळी बजाज स्कूटर साठी आणि टेलीफोनसाठी नंबर लावणे आणि जमलच तर एखादा फ्लॅट बुक करणे एवढीच मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांची लक्ष्मणरेषा होती. शिक्षक एवढेच नव्हे तर प्राध्यापकाचेही सायकल हेच वाहन होते. संध्याकाळी कामावरून घरी आले की पाय मोकळे करायला लकडी पूल, शनिवार वाडा, पर्वतीपर्यंत जाणे, अधूनमधून नीलायम, प्रभात, विजय हिंदी मराठी सिनेमे पाहणे , फारच चैन म्हणायची झाले तर टीळक रोडवर नेहरू स्टेडियम बाहेर असलेल्या अप्सरा ला कटलेट खायला जाणे … मध्यमवर्गीयांचे जीवन एवढे सुटसुटीत , मर्यादित आणि म्हणूनच छान होते. सर्दी, खोकला  असल्या किरकोळ आजारांवर औषध द्यायला फॅमिली डॉक्टर असायचे, त्यावेळी सर्दी खोकला झाल्यावर सतराशे साठ टेस्ट करून घेण्यास सांगणारे डॉक्टर अजून उदयाला आले नव्हते. हृद्य  विकार, रक्त दाब, मधुमेह, स्पोन्डिलायटीस अशा श्रीमंत आजारांनी त्यावेळी घरोघरी प्रवेश केलेला नव्हता. त्यावेळी फुले मंडईत भाजीला जाताना होंडा , सुझुकी अशा दुचाक्या घेऊन जाण्याची प्रथा रूढ झालेली नव्हती. भरपूर चालणे, सायकलिंग यांनी लहान थोरांच्या तब्येती ठणठणीत होत्या.फॅमिली डॉक्टरचे बिल ही किराणा दुकानदाराप्रमाणे महिन्याच्या महिन्याला चुकते व्हायचे. बहुतांश मध्यमवर्गीयांची घरे भाड्याचीच असायची. वास्तुशास्त्र, फेंगशुई सारख्या वास्तूंच्या शास्त्रांनी झपाटल नव्हतं. दुचाकी सुद्धा फार कमी लोकांकडे असायची. त्यामुळे रात्रीची झोपमोड व्हायला कारचा रिव्हर्स हॉर्न वगैरे भानगड नव्हती. एप्रिल मे मध्ये वसंत व्याख्यानमाला , मॅजेस्टीक गप्पा यांना तुडुंब गर्दी व्हायची. एकूण काय तर गरजा मर्यादित मात्र अमर्यादित अशी स्थिती असायची. त्या निवांत आयुष्यात , ' वेळच मिळत नाही ' अशी तक्रार करायला कोणालाच जागा नव्हती. निवान्तप्णाचा आणि आनंदाचा सुखाचा प्याला सुखाने एन्जॉय करता येत होता. 
आता हे सगळं इतिहासजमा शालेय याची जाणीव दीपक सरदेशमुख ला वारंवार छळायची. चिमणबागेतल्या चाळीत राहणाऱ्या दिपकने आपल्या आयुष्याची जवळपास तीस वर्षे तेथे घालवली होती. आता गावात राहणाऱ्या लोकांना पाय मोकळे करायला बाहेर पडावे म्हटले तर जीव मुठीत घेऊन चालावे लागते. एखाद्या सुट्टीला पर्यटन स्थळी जावे म्हटलं तर तीही माणसांच्या आणि वाहनांच्या गर्दीने गजबजलेली असतात. महाबळेश्वर, दिवेआगर, गणपती पुळे, पन्हाळा. हरी हरेश्वर … कुठेही जा सगळीकडे पुणेकरांची गर्दी असतेच. त्यात मोबाइल नामक कर्ण पिशाचाची भर पडलीय. शरीराने पुण्याबाहेर गेलात तरी मोबाइल तुम्हाला त्याच धकाधकीत आणून सोडतो. असो. आता हे असंच राहणार असे म्हणत दिपकने सुस्कारा टाकला. आजवर त्याने असे किती सुस्कारे टाकले असतील कोणाला ठाऊक ?
चंद्रहास मिरासदार                      
                                                            

Wednesday, 24 June 2015

त्या तिथे पलीकडे, तिकडे, माझिया 'छगन' चे झोपडे ….

 
भगवान शंकर आणि पार्वती पृथ्वीवर निघण्याच्या तयारीत होते. सगळा जामानिमा घेऊन त्यांचे विमान उड्डाण करते. विशेष म्हणजे आज त्यांचे चिरंजीव गणेश हेही आज त्यांच्या समवेत निघतात.  आज त्यांना पृथ्वीच्या दौर्यावर लग्बगॆन निघावं लागलंय. महाराष्ट्र देशातील छगन नामक एका भक्ताने केलेल्या आर्त धाव्यामुळे त्यांना पृथ्वीतलावर निघावे लागले होते. हा भक्त साधा सुधा नव्हता. महाराष्ट्र देशात या भक्ताची कीर्ती पसरली होती. बीओटी, टोल अशा अनेक सिद्धी त्याला वश होत्या. या सिद्धीद्वारे त्यांनी पृथ्वीवर बंगले, महाल, फार्म हाऊस बांधण्याचा धडाकाच लावला होता. अल्लाउद्दिन ज्या प्रमाणे दिवा घासून आपल्या मनातली इच्छा व्यक्त करीत असे आणि त्याची इच्छा पूर्ण होत असे त्या प्रमाणेच छगनरावांकडच्या या सिद्धी काम करीत असत. असे हे छगनराव अत्यंत उदार आणि भोळे म्हणून महाराष्ट्र देशात प्रसिद्ध होते. आपल्याकडे मदत मागायला येणाऱ्या बिल्डर नामक गरीब जमातीतील लोकांवर छगनराव सदोदित कृपा करीत असत. एखाद्या गरजू बिल्डरने हाताला काम नाही म्हणून छ्ग्न्रावनच्या दरबारात हजेरी लावावी आणि एखादा जमिनीचा तुकडा ( बोली भाषेत याला भूखंड म्हणतात) खिशात घालूनच परतावे असा जणू नियमच झालेला होता. त्यामुळेच त्यांची कीर्ती त्रिखंडात पसरली होती. त्यांच्याकडे मदत मागायला येणाऱ्या दारिद्र्य रेषे खालील बिल्डरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली होती. आपल्या दारी आलेला याचक आपल्या ओळखीचा आहे का, कोणाची शिफारस घेऊन आला आहे का, असली कसलीही चौकशी न करता छगनराव त्याला मदत करीत असत. गोरगरीब बिल्डरांना जमीन रुपी दान दिले तरच ही जमात अन्य लोकांच्या बरोबरीला येऊ शकेल , गरीब- श्रीमंत भेद संपुष्टात येईल असा छ्गनरावांचा 'समता'वादी दृष्टीकोन होता. सत्य साईबाबा ज्या प्रमाणे आपल्या भक्तांना हवेतून नाना वस्तू काढून देत असत, अगदी त्या प्रमाणेच हे छगनराव खिशातून भूखंडरुपी अंगारा काढून देत असत. प्रसाद रूपाने मिळालेल्या भूखंडावर गरीब बिचारे बिल्डर इमारत वगैरे बांधून आपल्या व कुटुंबियांच्या दोन वेळच्या भाजी भाकरीची सोय करीत असत. अशा कनवाळू छगनरावांचे बालपण अतिशय कष्टात गेले होते. तरुणपणी ते ' फुलं ' विकत असत म्हणे . मात्र तेवढ्याने आपली गुजराण होणार नाही हे दिसल्याने त्यांनी ' फुले ' विकायला सुरुवात केली. तरुणपणी हे छगनराव अतिशय छोट्या घरात रहात असत. वर सांगितल्याप्रमाणे बीओटी, टोल वगैरे सिद्धींमुळे छगनरावांची चांगलीच भरभराट झालेली होती. लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरू लागली होती.  अशा छगनरावांचा स्वभाव भगवान शंकराप्रमाणेच अत्यंत भोळा होता असे सांगितले जात असे. काही बिल्डर लोक त्यांना हातोहात फसवत असत म्हणे. आपण फार गरीब आहोत असे खोटेनाटे सांगून अनेक श्रीमंत मंडळी अधिक श्रीमंत होऊ लागली होती. असो. तर अशा या भक्ताच्या विनवणीमुळे भगवान शंकर पृथ्वीतलावर निघाले होते. विमानातून भगवान आपल्या भक्ताला शोधत होते. एकदाचा त्यांना आपला भक्त दिसतो. शंकराचे विमान खाली उतरते. भला मोठ्ठा बंगला, त्या बाहेर स्विमिंग पूल, १०० फुटांचा भक्कम लोखंडी दरवाजा, नजर जाइल तिथपर्यंत कुंपण, बंगल्याच्या बाहेर फळझाडे …. हे सारे चित्र भगवान शंकर, पार्वती आणि चि. गणेश पहातच राहतात.
' देवा, आत चला ' भक्त विनवतो. आतल्या महागड्या टाईल्स, छतावर लटकवलेली झुंबरे, दुर्मिळ पुरातन मुर्त्या, गालीचे, गुबगुबीत सोफे, खुर्च्या, भले मोट्ठे टीव्ही असलं वैभव पाहून शंकर फॅमिलीचे डोळे पांढरे होण्याची वेळ येते. त्यांनी स्वर्गात एकाही देवादिकाच्या सोडाच पण कुबेराच्याही घरे असे वैभव पाहिलेले नसते.
' भक्ता , छान बांधला आहे रे महाल. तुझी अशीच प्रगती होवो'. आपल्या भक्ताचा बंगला, डामडौल पाहून खुश झालेले शंकर भक्ताला आशीर्वाद देऊन टाकतात.
' हे पाहायला बोलावलं होतंस का मला एवढ्या घाइघाइने ' शंकर विचारतात. त्यावर छगनराव आपली कैफियत ऐकवायला सुरुवात करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीतलावर त्यांच्या अशा महालांवरून बराच गोंधळ माजलेला असतो. छगनरावांनी असे महाल बांधायला कोठून पैसा आणला असे विचारून लोकांनी त्यांना हैराण केले असते. छगनरावांच्या मते त्यांना हे सर्व सिद्धीने प्राप्त झालेले आहे. छगनरावांच्या मते  त्यांच्या या घराला महाल म्हणणे अयोग्य होते. हे घर म्हणजे झोपडेच होते. त्यातील वस्तूंसाठी आपल्याला एक पैसाही खर्च करावा लागलेला नसून हे सर्व चमत्कारामुळेच प्राप्त झालेले आहे. भगवान शंकरालाही त्याचे म्हणणे  पटले आहे असे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवू लागते. ते आपल्या भक्ताला या संकटातून बाहेर काढण्याचा आशीर्वाद देण्याच्या तयारीतही असतात. तेवढ्यात मागे उभे राहिलेले चि. गणेश पुढे येतात.
' एवढंच ना, तुमचे महाल महागडे नाहीत हेच सिद्ध करायचे आहे ना तुम्हाला. मग असं तुमच्या  या सगळ्या झोपड्या आम्हाला द्या आणि त्याच्या बदल्यात आमचा महाल घ्या. '
 चि. गणेशाची ही एक्स्चेंज ऑफर छगनरावांनी स्वीकारली का हे अजून कळावयाचे आहे.
चंद्रहास मिरासदार 

Saturday, 30 May 2015

हप्ता हप्ता … बुटा बुटा


रसिक वाचकहो, माझे नाव, गाव, घर क्रमांक, पिन कोड, मोबाइल क्रमांक वगैरे वगैरे इत्यंभूत माहिती एवढेच नव्हे तर माझी संपूर्ण कुंडली तुमच्याकडे असणार आहे याची मला खात्री आहे. त्याचे कारणही तसेच आहे. माझ्याशिवाय तुम्हा मध्यमवर्गीयांचे पानही हलत नाही. तुमच्या जीवनात मला श्वासाइतकेच महत्व आले आहे हे तुम्ही जाणून आहात. हप्ता या दोन शब्दांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले आहे. अल्लाउद्दिनचा दिवा घासल्यावर मनात इच्छा असलेली कोणतीही गोष्ट समोर हजर होत असे. तसेच माझे नामस्मरण केल्यानंतर घर, कार,  टीव्ही, फ्रीज, मोबाईल, वॉशिंग मशीन, म्युझिक सिस्टीम अशी सर्व सुखे तुमच्यापुढे हात जोडून उभी राहतात. हे कमी की काय म्हणून आता परदेश सहली साठीही माझा वापर होऊ लागला आहे. म्हणजे परदेशात ट्रीपसाठी जायचे असेल तरी बँका कर्जे देऊ लागल्या आहेत. म्हणजे तुमच्यासाठी मी अल्लाउद्दिनचा दिवाच आहे ना. मला तुमच्या जीवनात मिळालेल्या अनन्यसाधारण महत्वामुळे अर्थव्यवस्था नामक आमच्याच पैसा रुपी कुळातील एका बहिणीला चांगले दिवस आल्याचे अभ्यासक मंडळी सांगत असतात. असो. आज तुमच्यापुढे मी वेगळ्याच कारणासाठी मन मोकळं करायला आलो आहे. हल्ली मन मोकळं करायला व्हॉटस अप , फेसबुक, ब्लॉग, ट्विटर आदी बऱ्याच ' चावड्या ' आहेत. या चावडीवर जाउन मन मोकळं केलं तर बरेच जण ते पहातही नसतात. म्हणून हा मार्ग पत्करला. आज मी माझ्या जुळया भावाबाबत दोन शब्द बोलायला आलो आहे. 'हप्त्याचा जुळा भाऊ?' कोण असेल हा ? असा प्रश्न तुमच्या चेहऱ्यावर दिसतो आहे मला. जुळा भाऊ असला तरी आमच्या दोघांचे नाव एकच आहे. मला अलीकडे इएमाय या नावानेही ओळखू जाऊ लागले आहे. त्याचे तसे नाही. त्याला माझ्यासारखे दुसरे नाव नाही. तर या माझ्या जुळ्या भावाच्या पराक्रमाबद्दल बोलण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलो आहे. हा माझा जुळा भाऊ माझ्याप्रमाणेच अनेकांच्या जीवनात आनंद आणतो. मात्र त्या बद्दल कोणी चांगले बोलतच नाही हो. 'ईएमआय' ला एवढा आदर आणि मला शिव्याशाप का असा त्याचा प्रश्न आहे. माझा वापर तर सगळेच करतात, पण जाहीर बोलताना माझा उद्धार केला जातो, मला शिव्याशाप दिले जातात अशी त्याची म्हणजेच ' हप्त्या' ची  खंत आहे. तुम्ही सकाळी पेपर वाचता तेंव्हा तुम्ही रहात असलेल्या शहरात, गावात अवैध धंद्यांना ऊत, अवैध धंद्यांकडे पोलिसांचे ' अर्थ 'पूर्ण दुर्लक्ष अशा आशयाच्या बातम्या वाचत असता. अमुक अमुक गावात मटका, जुगार, हातभट्टी अशा धंद्यांना ऊत आला असून पोलिसांनी त्याकडे वेळीच लक्ष द्यावे अशा छापाच्या या बातम्या असतात. पोलिसांकडे जरा चौकशी केली तर असे धंदे असणार्या ठिकाणच्या पोलिस ठाण्यात अथवा चौक्यात आपल्याला पोस्टिंग मिळावे अशी पीएसआय वगैरे मंडळींची इच्छा असते. अशा पोलिस ठाण्यांमध्ये काम करणाऱ्या इन्स्पेक्टर वगैरे मंडळींना 'खात्या पित्या घरचे ' असे म्हणतात. तर माझ्या भावाने सांगितलेली एका अशाच एका पोलिस ठाण्याच्या साहेबाची कथा ऐका. आटपाट नगर होतं. या आटपाट नगरातील एका पोलिस ठाण्याचा साहेब बदलला, तसेच त्या एरियाचा साहेबही बदलला.हे ठाणे वर म्हटल्याप्र्माणे खात्या पित्या प्रकारातले होते. प्रत्येक पोलिस ठाण्यात वसुलदार नामक प्राणी असतो. या प्राण्याचा संबंध तुमच्या सारख्या पांढरपेशा लोकांशी येत नसतो. कारण तो सामान्य माणसासमोर कधीच येत नसतो. तर वसुलदार हा प्राणी मल्टी पर्पज यंत्रासारखा असतो. वरचा साहेब (एसीपी, डीवायएसपी) बदलला की  नवा साहेब कोण येणार, तो कसा आहे याची पोलिस ठाण्यात, चौक्यांत चर्चा चालू होत असते. काही काही वेळा नवा साहेब आपल्या एरियातले दारू, मटका वगैरे धंदे बंद करायला लावत असतो. तसं झालं की नवा साहेब खूपच कडक आहे अशी हवा तयार होऊ लागते. नवा साहेब 'देण्या घेण्या' तला आहे का याची माहिती ठाण्याच्या साहेबाबरोबरच वसुलदारही करीत असतो. नवा साहेब आधी ज्या ज्या ठिकाणी कामाला होता त्या ठिकाणच्या लोकांकडून ही माहिती काढली जाते. बहुतेक साहेब ' देणे - घेणे ' या पंथाचेच असतात. नवा साहेब या पंथातला असला तर ठाण्याची  साहेब लोकं शांत असतात. नव्या साहेबान असे धंदे बंद करायला लावले की ' हप्ता ' वाढवून पाहिजे म्हणून अशी नाटके चालू आहेत असे पोलिस खात्यात बोलले जात असते. तर वरचा साहेब बदलून आल्यानंतर प्रथेप्रमाणे त्याची सगळी माहिती काढली गेली होती. लग्न ठरवण्यापूर्वी मुला मुलीकडची लोकं मुला - मुलीबद्दल आसपास विचारून जशी माहिती काढत असतात तशीच नव्या साहेबाबद्दल माहिती काढली जाते.  त्यावरून नवा साहेब आपल्याच पंथातला आहे हे कळाले होते. वरच्या साहेबाच्या सांगण्यामुळे ठाण्याच्या साहेबाने आपल्या हद्दीतले सगळे धंदे बंद करून टाकले होते. प्रथेप्रमाणे वरच्या साहेबाला ठाण्याचे साहेब भेटायला गेले. वरच्या साहेबाने मानपान कोणत्या पद्धतीने करायचे हे सांगितले. तो आकडा ऐकून ठाण्याचे साहेब जरा विचारात पडले. एवढा हिशोब कसा जुळवायचा हे त्यांच्या लक्षात येईना. मात्र वरचा साहेब सांगेल त्या प्रमाणे मानपान करण्या शिवाय पर्याय नसतो. ठाण्यात आल्यावर साहेब लोकांची चर्चा चालू झाली. ही चर्चा ऐकणारा अण्णा केंगार नावाचा वसुलदार म्हणाला, साहेब काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. साहेब लोकं म्हणाले , कसं शक्य आहे हे ? अण्णा केंगार म्हणाला, आपल्या एरियात नवे धंदे सुरु करायला लावू. त्यानं पटापटा आपल्या एरियातल्या टपोरी लोकांना फोन केले. कुणाला हातभट्टी तर कुणाला मटका असे धंदे सुरु करायला लावले. हातभट्टी च साहित्यही अण्णा केंगारने त्या पोरांना उधार घेऊन दिले. दोन दिवसात सर्व अवैध म्हटले जाणारे धंदे चालू झाले. नव्या साहेबाचा ' वाढीव हप्ता ' व्यवस्थित भागवला गेला.
आणखी एक गोष्ट … आटपाट नगरातल्या अशाच एरियाचा साहेब बदलला गेला. त्याने आपल्या हाताखालील ठाण्याच्या साहेबाला बोलावून घेतले. वरच्या साहेबाकडून जाउन आल्यावर ठाण्याचा साहेब एकदम चिडचिड करायला लागला. ठाण्यातल्या बाकीच्या मंडळींना साहेब असा का वागतोय हे कळेना. रात्री सगळ्या मंडळींनी साहेबांना हॉटेल मध्ये नेले. तीर्थ पोटात गेल्यानंतर ठाण्याचा साहेब पोपटासारखा बोलायला लागला. वरच्या साहेबानं ठाण्याच्या साहेबाकड   हप्ता वाढवून मागितलेला होता. एक दोन हजाराची गोष्ट असती तर कोणाचीच हरकत नव्हती. मात्र एकदम पंचवीस तीस हजार वाढवून मागितल्याने ठाण्याचा साहेब हवालदिल झाला होता. नव्या साहेबाची मागणी कशी पूर्ण करायची यावर सागर संगीत विचार चालू झाला. त्या ठाण्यात अप्पा वाघमोडे नावाचा वसुलदार होता. हा अप्पा एकदम नंबरी माणूस होता. बारा गावचं पाणी प्यायलेला आणि पाच पन्नास साहेबांना पचवलेला अप्पा महाबिलंदर होता. आपल्या समोर चाललेले बोलणे तो शांतपणे ऐकत होता. त्याने ' होतीय सोय, काळजी करू नका ' एवढे पाच शब्दच उच्चारले. त्याचा स्वभाव ठाऊक असल्याने त्याला कोणीच बाकी काही विचारले नाही. दोनच दिवसात त्या गावात , उपनगरात अवैध धंद्यांना ऊत या सारख्या बातम्या सगळ्या पेपरला छापून आल्या. एकाच वेळी सगळ्या पेपरमध्ये बातम्या छापून आल्या, दोन चार चॅनल वाल्यांनीही या बातम्या छापल्या. बातम्या आल्या आल्या अप्पाने ठाण्यात सगळ्या धंदेवाल्यांना बोलावून घेतले. पेपरमधून बातम्या छापून आल्या आहेत, वरचा साहेब खवळलाय वगैरे वगैरे गोष्टी त्याने तिखट मीठ लावून सांगितल्या. धंदा चालू ठेवायचा असेल तर मुकाट हप्ता वाढवून द्या असं सांगितलं. या व्यावसायिक मंडळींनी मुकाट हप्ते वाढवून दिले. नंतर कळाले की अप्पाने पेपरवाल्यांना बोलावून नवा साहेब लईच ' खातो' असं सांगितलं होतं. पेपरवाल्यांनी लगेच बातम्या दिल्या. अशा प्रकारे नव्या साहेबाच्या वाढीव ' हप्त्या' ची सोय झाली.
तर ' हप्ता नारायणांच्या ' या गोष्टी ऐकल्यावर आपल्याबद्दल का वाईट बोललं जातंय असे आमच्या जुळ्या भावाचं म्हणण आहे. आहे का याचं उत्तर तुमच्याकडे ?
- चंद्रहास मिरासदार  

Tuesday, 21 April 2015

उसोंका, द्राक्षोंका सबका कहना हैं, एक हजारोंमे मेरे काका हैं


आमचे काका आणि भविष्य, ज्योतिष यांचं घट्ट नातं आहे. स्मार्ट फोन आणि व्हॉट्स अप हे जसे ' एक दुजे के लिये ' आहेत तसंच आमचे काका आणि भविष्य ही 'रब ने बना दी जोडी' आहे.ये फेविकॉल का   जोड हैं, टुटेगा नही '. तुम्ही म्हणाल हे कसं बुवा ? तुमच्या काकांच्या हातात कधीच कुंडल्या, पत्रिका, जुनी दाते पंचांग दिसत  वगैरे वगैरे कोणतीच अवजारं दिसत नाहीत, तरीही आमच्या काकांचं भविष्य, ज्योतिषाशी जवळचं नातं कसं , असा रोकडा सवाल तुम्ही करणार हे मला ठाऊक आहे. पण आमच्या काकांना भविष्य वगैरे सांगायला जुनी पंचांग, कुंडल्या, पत्रिका वगैरे साहित्याची जरुरी भासत नाही. त्यांच्या डोक्यात अनेकांच्या कुंडल्या, पत्रिका फिट्ट बसल्या आहेत. कोणाच्या पत्रिकेत गुरु , शनी कोणत्या स्थानी आहेत हे आमच्या काकांना माहिती असतं. फक्त माणसांचेच नव्हे तर अन्न धान्याच्या, द्राक्ष, डाळीम्बासारख्या फळांच्या , उसासारख्या पिकांचे भविष्य आमचे काका सांगत असतात. म्हणजे चालू वर्षी गहू , ज्वारीचे एवढे उत्पादन होणार , म्हणून गहू, ज्वारीचे भाव कमी होणार , वाढणार, उसाचे कमी उत्पादन होणार असल्याने साखरेचे भाव वगैरे वाढणार वगैरे वगैरे भविष्य आमचे काका सांगत असतात. तर अशा आमच्या काकांच्या स्वत:च्या भविष्याबद्दल कोणालाच काही सांगता येत नाही. म्हणजे ते केंव्हा कोणता निर्णय घेतील, रस्त्याच्या उजव्या बाजूने चालतील की डाव्या बाजूने की सरळ न जाता एकदम मागे फिरतील हे कोणीच सांगू शकत नाही. त्यांच्या साथीत चालणाऱ्या माणसालाही ते केंव्हा कोठे वळतील हे सांगता येत नाही. तर असे आमचे काका राजकारणातले थोर अष्टपैलू खेळाडू आहेत. फलंदाजी, गोलंदाजी,क्षेत्ररक्षण एवढेच नव्हे तर ते यष्टीरक्षणही छान जमतं. आपल्याच संघातील धावबाद करणे या सारखे खेळ त्यांना उत्तम जमतात असे त्यांचे मित्रच सांगतात. समजा काका फलंदाजी करत असले आणि एखाद्या लांब मारलेल्या फटक्यावर त्यांना धाव घ्यायची आहे असेल तर ते आपल्या नॉन स्ट्रायकर साथीदाराला धाव घेण्याची खून करतील मात्र त्याच्या नकळत प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्ररक्षकालाही खूण करतील. ही खूण कोणाच्याच लक्षात येत नाही. प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्ररक्षकाला केलेल्या खुणेमुळे काकांचा सहकारी फलंदाज धावबाद होत असे. या साथीदार फलंदाजाला काकानी क्षेत्ररक्षकालाही खून केली होती हे फार उशीरा लक्षात येत असे, तो पर्यंत तो साथीदार तंबूत परतलेला असे. असो. आमचे काका गोलंदाजीला उतरतात तेंव्हा काही वेळा ते ४०- ५० पावलांचा स्टार्ट घेतात. एवढा लांबलचक स्टार्ट पाहून प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या छातीत धडकीच भरते. त्याला वाटायचे आपल्या दिशेने आता बाउन्सर येणार पण कसचे काय काका एवढ्या लांबून पळत येउन काका अंडर आर्म बॉल टाकत असतात. असा बॉल कसा खेळायचा हे फलंदाजाला ठाऊक नसल्याने तो हमखास बाद होतो. प्रत्यक्ष क्रिकेटप्रमाणे राजकारणात अंडर आर्म चेंडू टाकायला बंदी नाहीये. कधी कधी सामना चुरशीचा होणार असे वाटत असतानाच ते प्रतिस्पर्धी संघाला पूर्ण षटके फलंदाजी करू देणे कसे हिताचे आहे हे सांगू लागतात. असे झाल्यावर सामन्यातील इंटरेस्ट संपून जातो असे त्यांच्या संघातलेच लोक म्हणतात. आमचे काका फिरकी गोलंदाजी करायला येतात तेंव्हा एक पाउल सुद्धा स्टार्ट घेत नाहीत , स्टंपाजवळ उभे राहून ते उंची दिलेला चेंडू टाकतात. असा एकदम हळू वेगाने टाकलेला चेंडू टप्पा पडल्यावर एकदम डोक्याच्या उंचीने उसळत असे. अनेक फलंदाजांना ही भुताटकी वाटत असे . शेन वॉर्न, मुरलीधरन यांच्या सारख्या गोलंदाजांनी त्यांच्याकडे हा ' चौथा ' नामक चेंडू कसा टाकावा या साठी शिकवणी लावली आहे असे कळते. काही वेळा काका आपल्या मूळ गावी ' बारामती ' ला जाण्यासाठी निघत, त्यांना सोडायला त्यांचे सहकारी, पाहुणे बस स्थानकावर जात असत. काका 'बारामती' ला जाणाऱ्या विना वाहक विना थांबा बस मध्ये बसत असत. पण त्यांना सोडायला आलेले सहकारी, पाहुणे गेल्यावर हे बारामतीची गाडी सोडून साबरमती च्या गाडीत हळूच बसत असत. तर असे हे काका. त्यांचे भविष्य, ज्योतिष यांचे नाते किती घट्ट आहे हे सांगण्यासाठी ही उदाहरणे दिली तर असे हे काका पर्वा वांद्र्यात गेले होते. वांद्र्यात जाउन त्यांनी ' नारायणराव येणार , फडणवीस सरकार जाणार पडणार ' असे भविष्य वर्तवले. नारायणरावांसाठी त्यांनी वांद्र्यात जाउन सभा घेतली. खरे तर त्या आधी काकांच्या बारामतीत माळेगाव ची इलेक्शन होती. तिकडे काका फिरकले देखील नाहीत. आपल्या घरचे कार्य सोडून ते शेजारच्या घरातल्या पोराच्या सोडमुंजेसाठी धावत गेले. नारायणरावांचे पाहुणेदेखील या सोडमुंजेला आले नव्हते. असो. बोहल्यावर चढलेल्या नारायणरावांना त्यांच्या मागे उभ्या राहिलेल्या मित्रांनी उचलून घेतले तरी आमदार सुंदरीच्या गळ्यात वरमाला घालता आली नाही. काकांचे भविष्य पुन्हा एकदा चुकले. पण एवढे झाले तरी आमचे काका नाराज झाले नाहीत. त्यांचा भविष्य सांगण्याचा खेळ चालूच आहे. परवा त्यांच्याकडे अजितदादा पवार नामक व्यक्ती आपल्या घड्याळाची पत्रिका घेऊन आली होती म्हणे. कितीही दुरुस्त केले तरी त्यांचे घड्याळ बंद पडतेय म्हणतात. अजितदादांना आमच्या काकांनी काय भविष्य सांगितले हे अजून कळले नाही.
- चंद्रहास मिरासदार

Saturday, 4 April 2015

हंगर अच्छें अच्छें को बदल देता है

चि. उद्धवराव, राजूभाऊ, सदाभाऊ, शीघ्र कवी सम्राट रामदासजी एकमेकांकडे पहात बसली आहेत. सदाभाऊ, राजाभाऊ, रामदासजी यांचे चेहरे भुकेने कासावीस झाले आहेत. न्याहरीची वेळ कधीच संपली आहे, जेवणाचीही वेळ टळून गेलेली आहे. एवढे होऊनही एखादे ताट, डिश येत नाहीये हे पाहून मंडळी अस्वस्थ आहेत. चि. उद्धवरावांच्या चेहऱ्यावर ' थोडा है , थोडे की जरुरत है ' असे काही तरी भाव दिसताहेत. भुकेने अस्वस्थ झालेले तिघे येरझाऱ्या मारताहेतं. मात्र चि. उद्धवराव जागेवरच बसून आहेत. कदाचित आपण जागेवरून उठलो तर आपण बसलोय ती जमीन सुद्धा संपादन केली जाइल अशी भीती त्यांना वाटते आहे. तसे झाले तर आपले डे लाईफ सुद्धा कठीण होईल अशी भावना  त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवते आहे. एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहूनही या मंडळींना आता कंटाळा येऊ लागला आहे. शेवटी राजाभाऊ हातकणंगलेकर उठतात आणि हातातले उसाचे कांडके गुडघ्यावर काडदिशी मोडतात आणि ऊस खाण्यास सुरुवात करतात. क़ाय करणार ' हंगर अच्छे अच्छे को बदल देता है '. पाच मिनिटातच ते ऊस संपवून टाकतात. उसाच्या चुइट्या सर्वत्र पसरलेल्या आहेत. त्यांचा चेहऱ्यावरील अस्वस्थतेची जागा आता संतापाने घेतलीय. आपण मागितलेली ' एफआरपी' न मिळाल्याने आधीच कावलेले सदाभाऊ राजुभाऊंकडे बारिक लक्ष ठेवून आहेत. राजूभाऊ चिडलेले आहेत, त्यांना आणखी डिवचण्याची हीच वेळ आहे हे लक्षात आल्याने सदाभाऊ उठतात. त्यांच्या आडूनच आपल्याला एखादी डिश मिळणार आहे हे त्यांना ठाऊक आहे.
' भाऊ किती दिवस रहायचं या घरात . आपल्याला काही स्वाभिमान आहे की नाही ?' सदाभाऊ मोठमोठ्याने बोलू लागतात. चिडलेल्या सदाभाऊंकडे उद्धवराव मिशीतल्या मिशीत हसत असावेत अशी शंका पाहणाऱ्याला आली असती. उद्धवरावांच्या मनातील भावना सदाभाऊंच्या कदाचित लक्षात आल्या असाव्यात.
' काय हसताय राव तुम्ही. तुमचं बरंय, तुम्हाला स्टार्टर तरी आलंय. आमचं अजून ताटच वाढायला घेतलेलं नाही,' सदाभाऊंच्या शब्दा शब्दातून वैताग प्रकट होतो आहे.
' अरे माझ्यापेक्षा तुमचंच चांगलंय. स्टार्टर देऊन किती वेळ बसवलंय आम्हाला. त्या स्टार्टरनं भूक जाम चाळवलीय. ' उद्धवराव फुसफुस चालू करतात.
' स्टार्टर मिळाल्यानंतर मेन कोर्स लवकर आला नाही तर पोटाचे काय हाल होतात हे तुम्हाला कळणार नाही , सदाभाऊ ' हा संवाद फेकताना उद्धवराव मान हलवत राहतात.
' मला या घरातून पळून जावंसं वाटायला लागलंय. ' राजूभाऊ आपले मौन सोडतात.
' तुमचं म्हणणं खरंय, पण इचलकरंजीत जाउन काय करायचं तरी काय ? तथ जाउन टाळ कुटत बसावं लागल' मगाचा ॲन्ग्रि यंग मॅन् चा लुक बदलत सदाभाऊ बोलू लागतात.
' तुझं म्हणणं खरंय, पण नुसत्या ' वासा' वर किती दिवस रहायचं ?' राजुभाऊंचा सवाल.
इतका वेळ हा संवाद शांतपणे ऐकणारे शीघ्र काव्य सम्राट रामदासजी आठवले आपलं जाकीट सावरत उठतात आणि बोलू लागतात.
' स्वाभिमानाने बसावे, स्वाभिमानाने उठावे
मंत्री होणार होणार म्हणत शांतपणे झोपावे
बाहेर जाउन कोठे रहावे ? कशाला उन्हात अंग भाजून काढावे ?
रामदासजी आठवले यांची अती शीघ्र कविता ऐकून राजूभाऊ चांगलेच गोरेमोरे होतात.
' मी जर तुमच्याजागी असतो तर केंव्हाच पळून गेलो असतो. ' चि. उद्धवराव फुसकुली सोडतात. उद्धवरावांचे बोलणे ऐकून राजुभाऊ ताडकन उठतात आणि आपली बॅग भरू लागतात. आता नक्कीच काही तरी होणार या अपेक्षेने उद्धवरावांचे डोळे लकाकू लागतात.
' सदाभाऊ , तुम्हाला यायचं असंल तर चला, मी चाललो 'असे म्हणत  राजूभाऊ पायात चपला सरकावू लागतात. त्यांचं बोलण ऐकल्यावर सदाभाउंची चुळबुळ चालू होते. ही परिस्थिती पाहून रामदासजी पुन्हा आपली कवितेची नॉन स्टॉप् एक्स्प्रेस चालू करतात.
' सदाभाऊ अशा मित्रांपासून सावध राहू '
जे तुम्हाला म्हणतात , चला घर सोडून जाऊ '
आपण गेलो तर ह्यांचंच फावणार,
आपल्या नावाखाली हेच लोणी खाणार '
रामदास्जींचे काव्य ऐकून राजूभाऊ भरलेली बॅग पुन्हा खाली ठेवतात.
- चंद्रहास मिरासदार