Saturday, 30 May 2015

हप्ता हप्ता … बुटा बुटा


रसिक वाचकहो, माझे नाव, गाव, घर क्रमांक, पिन कोड, मोबाइल क्रमांक वगैरे वगैरे इत्यंभूत माहिती एवढेच नव्हे तर माझी संपूर्ण कुंडली तुमच्याकडे असणार आहे याची मला खात्री आहे. त्याचे कारणही तसेच आहे. माझ्याशिवाय तुम्हा मध्यमवर्गीयांचे पानही हलत नाही. तुमच्या जीवनात मला श्वासाइतकेच महत्व आले आहे हे तुम्ही जाणून आहात. हप्ता या दोन शब्दांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले आहे. अल्लाउद्दिनचा दिवा घासल्यावर मनात इच्छा असलेली कोणतीही गोष्ट समोर हजर होत असे. तसेच माझे नामस्मरण केल्यानंतर घर, कार,  टीव्ही, फ्रीज, मोबाईल, वॉशिंग मशीन, म्युझिक सिस्टीम अशी सर्व सुखे तुमच्यापुढे हात जोडून उभी राहतात. हे कमी की काय म्हणून आता परदेश सहली साठीही माझा वापर होऊ लागला आहे. म्हणजे परदेशात ट्रीपसाठी जायचे असेल तरी बँका कर्जे देऊ लागल्या आहेत. म्हणजे तुमच्यासाठी मी अल्लाउद्दिनचा दिवाच आहे ना. मला तुमच्या जीवनात मिळालेल्या अनन्यसाधारण महत्वामुळे अर्थव्यवस्था नामक आमच्याच पैसा रुपी कुळातील एका बहिणीला चांगले दिवस आल्याचे अभ्यासक मंडळी सांगत असतात. असो. आज तुमच्यापुढे मी वेगळ्याच कारणासाठी मन मोकळं करायला आलो आहे. हल्ली मन मोकळं करायला व्हॉटस अप , फेसबुक, ब्लॉग, ट्विटर आदी बऱ्याच ' चावड्या ' आहेत. या चावडीवर जाउन मन मोकळं केलं तर बरेच जण ते पहातही नसतात. म्हणून हा मार्ग पत्करला. आज मी माझ्या जुळया भावाबाबत दोन शब्द बोलायला आलो आहे. 'हप्त्याचा जुळा भाऊ?' कोण असेल हा ? असा प्रश्न तुमच्या चेहऱ्यावर दिसतो आहे मला. जुळा भाऊ असला तरी आमच्या दोघांचे नाव एकच आहे. मला अलीकडे इएमाय या नावानेही ओळखू जाऊ लागले आहे. त्याचे तसे नाही. त्याला माझ्यासारखे दुसरे नाव नाही. तर या माझ्या जुळ्या भावाच्या पराक्रमाबद्दल बोलण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलो आहे. हा माझा जुळा भाऊ माझ्याप्रमाणेच अनेकांच्या जीवनात आनंद आणतो. मात्र त्या बद्दल कोणी चांगले बोलतच नाही हो. 'ईएमआय' ला एवढा आदर आणि मला शिव्याशाप का असा त्याचा प्रश्न आहे. माझा वापर तर सगळेच करतात, पण जाहीर बोलताना माझा उद्धार केला जातो, मला शिव्याशाप दिले जातात अशी त्याची म्हणजेच ' हप्त्या' ची  खंत आहे. तुम्ही सकाळी पेपर वाचता तेंव्हा तुम्ही रहात असलेल्या शहरात, गावात अवैध धंद्यांना ऊत, अवैध धंद्यांकडे पोलिसांचे ' अर्थ 'पूर्ण दुर्लक्ष अशा आशयाच्या बातम्या वाचत असता. अमुक अमुक गावात मटका, जुगार, हातभट्टी अशा धंद्यांना ऊत आला असून पोलिसांनी त्याकडे वेळीच लक्ष द्यावे अशा छापाच्या या बातम्या असतात. पोलिसांकडे जरा चौकशी केली तर असे धंदे असणार्या ठिकाणच्या पोलिस ठाण्यात अथवा चौक्यात आपल्याला पोस्टिंग मिळावे अशी पीएसआय वगैरे मंडळींची इच्छा असते. अशा पोलिस ठाण्यांमध्ये काम करणाऱ्या इन्स्पेक्टर वगैरे मंडळींना 'खात्या पित्या घरचे ' असे म्हणतात. तर माझ्या भावाने सांगितलेली एका अशाच एका पोलिस ठाण्याच्या साहेबाची कथा ऐका. आटपाट नगर होतं. या आटपाट नगरातील एका पोलिस ठाण्याचा साहेब बदलला, तसेच त्या एरियाचा साहेबही बदलला.हे ठाणे वर म्हटल्याप्र्माणे खात्या पित्या प्रकारातले होते. प्रत्येक पोलिस ठाण्यात वसुलदार नामक प्राणी असतो. या प्राण्याचा संबंध तुमच्या सारख्या पांढरपेशा लोकांशी येत नसतो. कारण तो सामान्य माणसासमोर कधीच येत नसतो. तर वसुलदार हा प्राणी मल्टी पर्पज यंत्रासारखा असतो. वरचा साहेब (एसीपी, डीवायएसपी) बदलला की  नवा साहेब कोण येणार, तो कसा आहे याची पोलिस ठाण्यात, चौक्यांत चर्चा चालू होत असते. काही काही वेळा नवा साहेब आपल्या एरियातले दारू, मटका वगैरे धंदे बंद करायला लावत असतो. तसं झालं की नवा साहेब खूपच कडक आहे अशी हवा तयार होऊ लागते. नवा साहेब 'देण्या घेण्या' तला आहे का याची माहिती ठाण्याच्या साहेबाबरोबरच वसुलदारही करीत असतो. नवा साहेब आधी ज्या ज्या ठिकाणी कामाला होता त्या ठिकाणच्या लोकांकडून ही माहिती काढली जाते. बहुतेक साहेब ' देणे - घेणे ' या पंथाचेच असतात. नवा साहेब या पंथातला असला तर ठाण्याची  साहेब लोकं शांत असतात. नव्या साहेबान असे धंदे बंद करायला लावले की ' हप्ता ' वाढवून पाहिजे म्हणून अशी नाटके चालू आहेत असे पोलिस खात्यात बोलले जात असते. तर वरचा साहेब बदलून आल्यानंतर प्रथेप्रमाणे त्याची सगळी माहिती काढली गेली होती. लग्न ठरवण्यापूर्वी मुला मुलीकडची लोकं मुला - मुलीबद्दल आसपास विचारून जशी माहिती काढत असतात तशीच नव्या साहेबाबद्दल माहिती काढली जाते.  त्यावरून नवा साहेब आपल्याच पंथातला आहे हे कळाले होते. वरच्या साहेबाच्या सांगण्यामुळे ठाण्याच्या साहेबाने आपल्या हद्दीतले सगळे धंदे बंद करून टाकले होते. प्रथेप्रमाणे वरच्या साहेबाला ठाण्याचे साहेब भेटायला गेले. वरच्या साहेबाने मानपान कोणत्या पद्धतीने करायचे हे सांगितले. तो आकडा ऐकून ठाण्याचे साहेब जरा विचारात पडले. एवढा हिशोब कसा जुळवायचा हे त्यांच्या लक्षात येईना. मात्र वरचा साहेब सांगेल त्या प्रमाणे मानपान करण्या शिवाय पर्याय नसतो. ठाण्यात आल्यावर साहेब लोकांची चर्चा चालू झाली. ही चर्चा ऐकणारा अण्णा केंगार नावाचा वसुलदार म्हणाला, साहेब काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. साहेब लोकं म्हणाले , कसं शक्य आहे हे ? अण्णा केंगार म्हणाला, आपल्या एरियात नवे धंदे सुरु करायला लावू. त्यानं पटापटा आपल्या एरियातल्या टपोरी लोकांना फोन केले. कुणाला हातभट्टी तर कुणाला मटका असे धंदे सुरु करायला लावले. हातभट्टी च साहित्यही अण्णा केंगारने त्या पोरांना उधार घेऊन दिले. दोन दिवसात सर्व अवैध म्हटले जाणारे धंदे चालू झाले. नव्या साहेबाचा ' वाढीव हप्ता ' व्यवस्थित भागवला गेला.
आणखी एक गोष्ट … आटपाट नगरातल्या अशाच एरियाचा साहेब बदलला गेला. त्याने आपल्या हाताखालील ठाण्याच्या साहेबाला बोलावून घेतले. वरच्या साहेबाकडून जाउन आल्यावर ठाण्याचा साहेब एकदम चिडचिड करायला लागला. ठाण्यातल्या बाकीच्या मंडळींना साहेब असा का वागतोय हे कळेना. रात्री सगळ्या मंडळींनी साहेबांना हॉटेल मध्ये नेले. तीर्थ पोटात गेल्यानंतर ठाण्याचा साहेब पोपटासारखा बोलायला लागला. वरच्या साहेबानं ठाण्याच्या साहेबाकड   हप्ता वाढवून मागितलेला होता. एक दोन हजाराची गोष्ट असती तर कोणाचीच हरकत नव्हती. मात्र एकदम पंचवीस तीस हजार वाढवून मागितल्याने ठाण्याचा साहेब हवालदिल झाला होता. नव्या साहेबाची मागणी कशी पूर्ण करायची यावर सागर संगीत विचार चालू झाला. त्या ठाण्यात अप्पा वाघमोडे नावाचा वसुलदार होता. हा अप्पा एकदम नंबरी माणूस होता. बारा गावचं पाणी प्यायलेला आणि पाच पन्नास साहेबांना पचवलेला अप्पा महाबिलंदर होता. आपल्या समोर चाललेले बोलणे तो शांतपणे ऐकत होता. त्याने ' होतीय सोय, काळजी करू नका ' एवढे पाच शब्दच उच्चारले. त्याचा स्वभाव ठाऊक असल्याने त्याला कोणीच बाकी काही विचारले नाही. दोनच दिवसात त्या गावात , उपनगरात अवैध धंद्यांना ऊत या सारख्या बातम्या सगळ्या पेपरला छापून आल्या. एकाच वेळी सगळ्या पेपरमध्ये बातम्या छापून आल्या, दोन चार चॅनल वाल्यांनीही या बातम्या छापल्या. बातम्या आल्या आल्या अप्पाने ठाण्यात सगळ्या धंदेवाल्यांना बोलावून घेतले. पेपरमधून बातम्या छापून आल्या आहेत, वरचा साहेब खवळलाय वगैरे वगैरे गोष्टी त्याने तिखट मीठ लावून सांगितल्या. धंदा चालू ठेवायचा असेल तर मुकाट हप्ता वाढवून द्या असं सांगितलं. या व्यावसायिक मंडळींनी मुकाट हप्ते वाढवून दिले. नंतर कळाले की अप्पाने पेपरवाल्यांना बोलावून नवा साहेब लईच ' खातो' असं सांगितलं होतं. पेपरवाल्यांनी लगेच बातम्या दिल्या. अशा प्रकारे नव्या साहेबाच्या वाढीव ' हप्त्या' ची सोय झाली.
तर ' हप्ता नारायणांच्या ' या गोष्टी ऐकल्यावर आपल्याबद्दल का वाईट बोललं जातंय असे आमच्या जुळ्या भावाचं म्हणण आहे. आहे का याचं उत्तर तुमच्याकडे ?
- चंद्रहास मिरासदार  

No comments:

Post a Comment